पुर्नविवाहाला 11 हजार सानुग्रह अनुदान
राधानगरी /प्रतिनिधी
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राधानगरी ग्रामपंचायतने विधवांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून छ, शाहू महाराज यांची कर्मभूमी असलेल्या राधानगरी शहरांने विशेष ग्राम सभा घेऊन विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केला, व पुनर्विवाह साठी विधवा महिलेला 11 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला, या निर्णयास सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच भाग्यश्री पाटील व सर्व ग्रा प सद्यस्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.
छ. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा वारसा जपत व सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत राधानगरी शहर नेहमीच अग्रेसर राहील असा कृतिशील संदेश गावसभेने दिला आहे, सरपंच कविता शेट्टी व उपसरपंच भाग्यश्री पाटील व सर्व ग्रा प सद्यस्य व शहरवासीय यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
विधवा प्रथेमुळे पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायतील जोडव्या काढणे, हातातील बांगडया फोडणे, गळ्यातील मणीमंगळसूत्र काढून ठेवणे, विधवा महिलांना धार्मिक व सामाजिक कार्यात डावलणे,यामुळे महिलांच्या नैसर्गिक हक्कावर व अधिकारावर गदा येणे, विधवा महिलांना इतर सामान्य स्त्री प्रमाणे जीवन जगता यावे म्हणून विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी ,ग्रामसेवक एम.आर.गुरव, सदस्या आनंदी पाटील, सरिता बालनकर, अनुराधा तायशेटे, तानाजी कुंभार,दीपक शेट्टी, मिथुन पारकर,शत्रुघ्न सांगावकर,सचिन पालकर , महेश अडसूळ यांच्यासह सर्व ग्रा प सद्यस्य व शहरवासीय उपस्थित होते.