नागरी हवाई वाहतूक व पोलाद केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
भारताचा इतिहास संस्कार मूल्य दिशा आणि क्षमता एकत्रित ठेवण्यासाठी मातृशक्तीचे मोठे योगदान राहिले आहे. आगामी काळात कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशासनात येवून शासनाचे हात व डोळे बनणार आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेत जीवनात मोठे होण्यासाठी पवित्र लक्ष ठेवले पाहिजे. मन व मेंदू यापेक्षा हृदयापासून कष्ट केल्यास जनसेवेचा वसा जोपासता येईल, असे प्रतिपादन नागरी हवाई वाहतूक व पोलाद केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयात भास्करावार्य प्रतिष्ठानच्या दायित्व निधी व लोकसहभागातून बांधलेल्या राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थीनी वसतिगृहात राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले, आत्मनिर्भर बनण्यासाठी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी नौका भारताने बनवली. त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करून ही नौका नौदलात दाखल झालीय. त्यामुळे भारताने इंग्लंडला मागे टाकत जगातील पहिल्या तीन देशात स्थान मिळवून, आपली शक्ती जगाला दाखवली. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात काळाबरोबर जाताना विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे. त्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण घेवून आपल्या संकल्पनेतील नवनवीन अविष्कार जगासमोर आणावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा पुढे घेवून जाण्याची जबाबदारी तरूणाईची आहे. स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी यांचे खूप मोठे योगदान आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी बैजाबाई सिंधिया, गंगाबाई सिंधिया लक्ष्मीबाई सिंधिया व विजयाराजे सिंधिया यांनी केलेले कार्य तेवढेच महत्वाचे आहे. चित्रकार सुनील जोशी यांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांचे तैलचित्र हुभेहुभ काढून माझ्या आजीच्या आठवणी जाग्या केल्या. जनसेवा हे त्यांच्या जीवनाचे लक्ष होते, त्यामुळे त्यांच्या विचारानुसार मी माझा संपूर्ण जीवनप्रवास करतो. विद्यार्थ्यांनीही हृदयापासून काम करून राजनितीसह प्रत्येक क्षेत्रात आपला संकल्प पूर्ण करावा.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राजमाता विजयाराजे सिंधीया यांनी वसतिगृहात राहून शिक्षण घेतले होते. त्यांचा राजकीय व सामाजिक कार्यातील प्रवास प्रेरणादायी आहे. तत्कालिन दुष्काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेवून जनतेला अन्नधान्य पुरवले. तुम्ही त्यांच्या विचाराचा वारसा जपत कृषी क्षेत्रासह सरकारी क्षेत्रात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरा. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी आभार मानले. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, कुलसचिव प्रमोद लहाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी साधरला विद्यार्थीनींशी संवाद
कृषी महाविद्यालयातील कार्यक्रम संपल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्टेजवरून खाली आल्यावर विद्यार्थीनींशी संवाद साधला. तुम्ही भारताचे भविष्य आहात त्यामुळे मन आणि मेंदू एकाग्र करून, शिक्षण घेवून शासनाला बळ द्या, सल्ला देत, विद्यार्थीनींबरोबर फोटोही काढला. त्यामुळे विद्यार्थीनींमध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच मी येथे खासदार, मंत्री म्हणून आलो नसून मराठी माणूस म्हणून आल्याचे सांगितले.