केएमटीला 54 हजारांचे उत्पन्न
विनोद सावंत / कोल्हापूर
केवळ महिलांसाठी सुरू केलेल्या स्पेशल बसला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने ही बससेवा टॉप गिअरवर आहे. केवळ 15 दिवसांत 5500 महिलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. केएमटीच्या तिजोरीत यामधून तब्बल 54 हजार जमा झाले आहेत. सध्या एक बस सेवा देत असून यामध्ये आणखीन बस वाढविण्याचे नियोजन आहे.
केएमटीला रोज 4 लाखांचा तोटा होत आहे. कोरोनामध्ये यामध्ये वाढच झाली. सध्या कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे केएमटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केएमटी प्रशासनाकडून तोटा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना राबवल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या उपलब्ध असणाऱया बसमधूनच विशेष बससेवा सुरू केल्या जात आहेत.
केएमटी बसमधून महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार व नियमित प्रवास करणाऱ्या महिलांची लक्षणीय आहे. यामुळेच महापालिका आणि केएमटी प्रशासनाने केवळ महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री सतेज पाटील, मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही या बससाठी जोर धरला. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांनी पहिली केवळ महिला विशेष बस सेवेला प्रारंभ केला. शालेय, महाविद्यालयीन महिला विद्यार्थींनी, महिला कर्मचारी तसेच अन्य महिला वर्गासाठी ही सेवा फायदेशीर ठरत आहे. विशेष म्हणजे या बसमधून महिला प्रवाशांसोबत असणाऱ्या 3 ते 12 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना प्रवास करण्यास मुबा दिली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये महिलांच्या या स्पेशल बसला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रोज 400 पेक्षा जास्त महिला या बसमधून प्रवास करत आहेत.
विशेष महिला बसचा मार्ग
शाहू मैदान-आर.के.नगर-जिल्हा परिषद मार्गे शुगरमिल व परत शुगरमिल येथून मार्गस्थ होवून जिल्हा परिषद-आर.के. नगर मार्गे शाहू मैदान
महिला बससेवेची स्थिती
-रोज फेऱ्या-10
-सेवेत असणारी बस संख्या-1
-रोजची प्रवासी संख्या-400
-15 दिवसांतील प्रवासी संख्या-5500
-केएमटीला आतापर्यंत मिळालेले उत्पन्न-54 हजार
बस संख्या वाढविण्याचे नियोजन
महिलांसाठीच्या विशेष बससेवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोज 400 प्रवासी प्रवास करत आहे. केएमटी प्रशासनाकडून बस उपलब्ध होतील तसे स्पेशल महिलांच्या सेवेमध्ये आणखीन बस वाढविण्याचे नियोजन आहे.
रविकांत धुपकर, सहायक वाहतूक निरिक्षक, केएमटी
जोतिबा, पन्हाळा बस सेवा बंद
केएमटीने उत्पन्न वाढीसाठी जोतिबा आणि पन्हाळा या मार्गावर बस सेवा सुरू केली. परंतू अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने महिन्यामध्येच दोन्ही मार्गावरील बस बंद करण्याची वेळ केएमटी प्रशासनावर आली. यापूर्वीही या मार्गावर बससेवा सुरू केली होती. त्यावेळीही प्रतिसाद नसल्याने बंद केली होती. करवीर दर्शन बससेवेची हीच स्थिती झाली.