जठारवाडी गावावर शोककळा
शिये / सतीश पाटील
जठारवाडीतील ग्रामस्थांच्या कानावर मंगळवारी सकाळी सात वाजता ऍम्बुलन्सच्या सायरनचा आवाज आला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. सोमवारी रात्रीपासूनच दुःखाच्या सागरात बुडालेल्या जठारवाडीकरांच्या मनातील दुःखाचा बांध फुटला. त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय उठून टाकणारा होता.
सादळे- मादळे डोंगराच्या पायथ्याशी असणारे जठारवाडी हे सुमारे 2300 लोकसंख्या असणारे गाव. या गावांमध्ये सुमारे 125 वारकरी आहेत. ते पुर्वी आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी जातात तर गेल्या तीन वर्षापासून कार्तिकी वारीसाठी पायी दिंडीने पंढरपूरला जात आहेत. सोमवारी रात्री सातच्या सुमारास वारकऱयांच्या अपघाताची बातमी समजल्यापासून जठारवाडी गावातील नागरिकात नातेवाईकांची विचारपूस सुरु झाली. मंगळवारी सकाळी वारकऱयांचे मृतदेह प्रत्येकाच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी गावातील संपूर्ण वातावरण शोकाकुल बनले होते. याच शोकाकुल वातावरणात वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे थांबून मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रा ट्रॅक्टर ट्रॉलीतून निघाली. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी झाली होती.
सादळे – मादळे ग्रामस्थांच्या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या
सादळे मादळे डोंगर पायथ्याला पाच वारकऱयांची चितेला अग्नी दिला.त्याचवेळी सादळे मादळेच्या डोंगरमाथ्यावर पाच वर्षांपूर्वी माले फाटा येथे झालेल्या अपघातात 13 जणांना दुर्दैवी पणे जीव गमवला होता. त्यापैकी सात नागरिकांची चिता सलग रचण्यात आली होती. व त्यांना एकाच वेळी भडाग्नी देण्यात आला होता. याच्या कटू आठवणी उपस्थितांपैकी अनेकांनी यावेळी बोलून दाखवल्या.
हसतमुख सर्जेराव यांच्या जाण्याने कुटुंब उघडय़ावर
मयत सर्जेराव जाधव त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आहेत. गेले एक वर्षापासून ते दिंडीमध्ये सहभागी होत होते. उत्साही व हसतमुख असलेले जाधव हे दिंडीमध्ये पताका चांगल्या प्रकारे नाचवून दिंडीत उत्साह निर्माण करत होते. सर्जेराव यांच्या अपघाती निधनाने सर्जेराव यांचा संसार उघडय़ावरती पडला आहे.
नात्यागोत्यावर काळाचा घाला,…
जठारवाडी येथील किराणा दुकानदार दिनकर जाधव यांचे या अपघाताने सर्वस्वच हिरावून नेले आहे.दिनकर यांच्या भगिनी सुनिता काटे, भावजयी रंजना जाधव,भाची सुशीला पवार व भाचीचा मुलगा गौरव पवार (वळीवडे) हे चौघेही अपघातात मरण पावल्याने जाधव काटे व पवार परिवाराची अवस्था दयनीय झाली आहे. तर जाधव यांचे मेव्हणे सुभाष काटे हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मयत शारदा घोडके या माहेरीच राहत होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ,भावजयी असा परिवार आहे. तर मयत शांताबाई जाधव यांच्या पश्चात पती मुलगा दोन विवाहित मुली व नातवंडे आहेत.
दुःखाच्या छायेखाली असलेल्या जठारवाडकरांचे भय अजूनही संपलेले नाही. जखमी पैकी एकाची अवस्था गंभीर असल्याचे नातेवांच्या कानावर येत आहे. त्यामुळे जखमी असलेल्या वारकऱयांची विचारपूस नातेवाईक व ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे.