कागलच्या जनतेने जाती- धर्माचा विचार कधीच केला नाही- सिने अभिनेते नाना पाटेकर
कागलमध्ये महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण
कागल / प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीत पुतळ्याचे अनावरण नसून विचारांचे अनावरण झाले आहे. पुतळे उभा केल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही तर ती सुरू होते. पुतळ्यांचे नव्हे तर विचारांचे रक्षण करा. कागलच्या जनतेने जाती धर्माचा विचार केला असता तर हसन मुश्रीफ हा माणूस निवडून आला नसता असे प्रतिपादन सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
कागल शहरात महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज अलोट गर्दीत संपन्न झाला. सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. व्यासपीठावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खा . धैर्यशिल माने , आमदार प्रकाशराव आबिटकर , आमदार राजेश पाटील, आमदार पी. एन. पाटील , आमदार जयश्री जाधव, आमदार राजीव आवळे, आमदार जयंत आसगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नाना पाटेकर म्हणाले, कागलकर नशीबवान आहात असा माणूस तुम्हाला मिळाला आहे. सहावेळा उभारून पाच वेळा आमदार होणे सोपं नाही. आता पुढच्या वेळी फक्त मुश्रीफ उभे आहेत एवढेच पुरे आहे. त्यांच्यापुढे जिंकण्याची कोणाचीही पात्रता नाही. महामानवांचे आयुष्य सर्वांसाठी खर्ची पडले आहे. कागल शहरात नाटय़गृह बांधा, मी नाटक करायला येईन. चुकीचे विचार ऐकू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार कामाचा माणूस आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या कामाच्या मागण्या पूर्ण करतील असा विश्वास मी देतो.
अडचणीच्या काळात अभिनेते अशोक सराफ यांनी फार मोठा आधार दिला आज त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस असताना मी तिथे असायला होतो अशी खंत देणे व्यक्त केली यावेळी श्रोत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी दोन डायलॉग म्हटले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ही भूमी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आहे. नाना पाटेकर हे अमिताभ बच्चन यांच्या तोडीचा कलाकार आहे. नाना पाटेकर हा मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या नाम फाउंडेशन आणि आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक कार्याला दंडवत घातला पाहिजे.नाना पाटेकर यांच्या डायलॉमध्ये व अभिनयातून राष्ट्रभक्ती , देश प्रेम दिसून येते असे सांगून मंत्री मुश्रीफ यांनी नाना पाटेकर यांचे काही डायलॉग म्हणून दाखवले.
खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, समतेच्या वाटेवरून सर्वांना पुढे जायचे आहे. कागलचा हा समतेचा जागर देशात जावा.
राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, बारामतीनंतर कागलचे नाव घ्यावे लागेल इतके विकासकाम झाले आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या रुपाने कागलच्या जनतेने समतेचा जागर केला आहे.
खा . धैर्यशिल माने म्हणाले, समतेचा जागर कागलमधून सुरु होऊन संपूर्ण हिंदुस्थानात जात आहे. मंत्री मुश्रीफ यांचा स्पर्श प्रत्येकाच्या आयुष्याला झाला आहे. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सचिनभाऊ साठे,
आदींची भाषणे झाली.
स्वागत माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर व प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार सुजित मिणचेकर, संजयबाबा घाटगे , संध्यादेवी कुपेकर , मानसिंगराव गायकवाड, ए . वाय . पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, सतीश पाटील, सिध्दार्थ बने आदीसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते , नागारिक, महिला उपस्थित होते.
तुम्ही सिनेमात काम करा .. मी निवडणूक लढवतो
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिनेअभिनेते नाना पाटेकर यांचे सिनेमातील काही डायलॉग आपल्या भाषणात बोलून दाखवले . यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . याचा संदर्भ घेत नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात, ’मुश्रीफसाहेब , तुम्ही सिनेमात काम करा …मी तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो. साहेबांच्या कामावर मी नक्कीच निवडून येईन, अशी मिश्किल टिप्पणी नाना पाटेकर यांनी करताच व्यासपीठावरील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.