कसबा बीड /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील सातेरी महादेव डोंगर परिसरात पाच सहा दिवसापूर्वी लागलेल्या वणव्यामुळे हजारो झाडे जळाल्यासंदर्भात दै. तरुण भारतने मंगळवारी (दि.२१) याबाबत रोखठोक बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने भागातील पर्यावरण प्रेमी युवकांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या साहाय्याने वणव्यात होरपळलेल्या झाडांना पाणी देऊन जीवदान देण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
डोंगरावर वनराई निर्माण व्हावी म्हणून सामाजिक वनीकरण, परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी व लोकसहभागातून अधिकाधिक झाडे जगविण्यात यश आले होते.
डोंगरावरील पाण्याची दुर्भीक्षता पाहता ही झाडे जगविण्यासाठी हजारों हात झटले होते. मात्र मागील पाच सहा दिवसांपूर्वी डोंगरावर लावलेल्या आगीमुळे झाडांची झालेली मोठी हानी पाहून सर्व जण व्यथित झाले.
वणव्यात हजारो झाडे तर जळालीतच. शिवाय हजारो झाडे होरपळून देखील कशी बशी तग धरून आहेत. अशा झाडांना तात्काळ पाणी दिले तर ती वाचू शकतात म्हणून तात्काळ राजेंद्र सूर्यवंशी यांनी स्वखर्चाने महानगरपालिकेचा अग्निशामक दलाला पाचरण केले आणि भागातील युवकांना घेऊन सुमारे एक हजार झाडांना पाणी देण्याचे काम केले. या कामी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कृष्णात माने, श्रीरंग माने, रोहित दिंडे, सूरज चव्हाण, सुनील चव्हाण, संकेत बचाटे, शैलेश चौगले, शेखर दिंडे, गोरख खोंद्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सातेरी महादेव डोंगर व असणारा निसर्ग याच्या बाबतीत दैनिक तरुण भारत च्या माध्यमातून वृत्त सादर केले होते. तसेच या डोंगर भागामध्ये हजारो झाडांची केलेली लागण व त्यांची निगा राखत असणारे भागातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कार्याची माहिती वेळोवेळी प्रसिद्ध होत होती.पण जेव्हा आगीत होरपळून हजारो झाडे भस्मसात झाली.या वृत्ताची दखल घेत राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून मरगळलेल्या वनसंपदेसाठी बचावकार्य राबविण्यात आले. कसबा बीड भागातील सर्व नागरिक व ग्रामस्थांच्याकडून दैनिक तरुण भारतचे आभार व्यक्त होत आहे.