Kolhapur : कोल्हापुरात हद्दवाढ कृती समितीनं ग्रामीण भागात जाणाऱ्या केएमटी बस रोखल्या आहेत. हद्दवाढ कृती समितीनं आंदोलन करत शहरासह ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस रोखल्या. २४ पैकी २२ मार्ग तोट्याचे आहेत. हे मार्ग बंद करून तो पैसा शहराच्या विकासासाठी वापरावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
कोल्हापुरात केएमटी वर्कशाॅप बाहेर हे आंदोलन केलं. त्यामुळे हद्दवाढीवरून ग्रामीण विरूध्द शहर असा नवा वाद सुरु झाला आहे.
ग्रामीण भागातील नेत्यांनी हद्दवाढीला विरोध केल्यानं आंदोलन छेडले गेले आहे.केएमटी बंद असल्याने विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे हाल झाले आहेत. अनेक भागात केएमटी आली नसल्याने त्याचा फटका ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी आणि मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना बसला.
शहर हद्दवाडीला विरोध करणाऱ्या नागरीकांना आमची सेवा का द्यायची असा सूर सध्या उमटत आहे. हद्दवाढीचा विरोध निघाल्यानंतर ग्रामीण भागातील काही नागरीकांनी शहरात येण्यास नकार दर्शविला आहे. शहराचा विकास झालेला नाही. आम्ही शहरात येऊन काय करू असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला उत्तर म्हणून आज आंदोलन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. २४ पैकी २२ मार्ग तोट्याचे आहेत. त्य़ातील बरेचसे मार्ग ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील सेवा ग्रामीण भागाला का द्यायची असा सवाल केला जात आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ विरोधात चाललेल्या आंदोलनामध्ये सोमवारी सकाळी अचानक कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी बस गावामध्ये यायच्या बंद झाल्या. आठ दिवसांच्या गणपतीच्या सुट्टीनंतर आज सकाळी ग्रामीण भागातील मुले शाळा, कॉलेजला जाण्यासाठी गावातील बस स्टँडवर जमा झाली. पण या आंदोलनाची कल्पना विद्यार्थ्यांना, भाजीपाला घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्हती त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ऑटो रिक्षा आणि खासगी वाहनांनाचा आधार विद्यार्थी, शेतकऱ्यांनी घेतला.