7 ऑक्टोंबरला सहा जिह्यातील वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त; सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांना आता एकच ओळीचे पत्र; खंडपीठ कृती समितीची बैठक; सर्किट बेंच प्रश्नी सबुरी संपली आता लढा सुरु
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर सर्किटबेंचसाठी सहा जिह्यातील वकील, पक्षकार सबुरीने लढा देत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आता आम्हाला भेट नको आहे, तर मुख्यमंत्री न्यायमुर्ती यांची भेट आवश्यक आहे. सर्किट बेंचचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून यासाठी 7 ऑक्टोंबर (शुक्रवार) रोजी सहा जिह्यातील वकील 1 दिवसासाठी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत. तर याच दिवशी सहा जिह्यातील वकील एकाच वेळी मोर्चाने जिल्हाधिकाऱयांना 1 ओळीचे निवेदन देण्याचा एकमुखी ठराव बुधवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला.
खंडपीठाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सहा जिह्यातील वकीलांची बुधवारी जिल्हा न्यायसंकुलामध्ये बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गिरीष खडके होते. यावेळी कोल्हापूर बारचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, सचिव ऍड. विजयसिंह ताटे – देशमुख, सह सचिव ऍड. संदीप चौगुले, माजी अध्यक्ष ऍड. प्रशांत चिटणीस, ऍड. शिवाजी राणे, अजित मोहिते, संपतराव पवार पाटील, ऍड. रविंद्र जानकर, ऍड. गुरुप्रसाद माळकर, ऍड. विजय महाजन उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. विवेक घाटगे म्हणाले, आता आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट नको आहे. चीफ जस्टीस व मुख्यमंत्र्यांची बैठक होणे व या बैठकीस सर्व विभागांचे सचिव उपस्थित असणे गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर घाटगे यांनी बैठकीत 3 ठराव मांडले हे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष ऍड. संग्राम देसाई म्हणाले, सर्किट बेंच प्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च न्यायालय सकारात्मक आहे. सर्किट बेंचचा लढा एका निर्णायक टप्प्यावर आला असून सबुरीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सहा जिह्यातील प्रलंबीत खटल्यांची माहिती गोळा करण्यासाठी 10 ज्युनिअर वकीलांची नेमणूक करुन परिपुर्ण अहवाल तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य ऍड. महादेवराव आडगुळे म्हणाले, राज्य सरकार सर्किट बेंचप्रश्नी सकारात्मक आहे. पण या प्रश्नी चालढकल सुरु आहे. मुख्यमंत्री मुख्यन्यायाधीश यांची भेट प्रलंबीत आहे. त्यामुळे सर्किट बेंचकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी ऑक्टोंबर महिन्यापासून आंदोलन सुरु करणे गरजेचे आहे.
बैठकीत सातारा बारचे ऍड. शिवाजी मर्ढेकर, सांगली बारचे अध्यक्ष ऍड. प्रशांत जाधव, रत्नागिरीचे दिलीप धारीया, पंढरपुरबारचे अध्यक्ष ऍड. भगवानराव मुळे, सिंधुदुर्गचे उमेश सावंत, माळशिरसचे ऍड. नितीन खराडे, सांगोला बारचे ऍड. डी. जी. मेटकरी, सातारा बारचे ऍड. दिलीप पाटील, इस्लामपुर बारचे ऍड. दिग्वीजय पाटील, विटा बारच्या ऍड. शौर्या पवार, इचलकरंजी बारचे ऍड. विश्वास चिडमुंगे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक सचिव विजयकुमार ताटे – देशमुख यांनी केले.
बैठकीत झालेले ठराव
- मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सर्किट बेंचचा निर्णय घेण्यात येईल असा पत्रव्यवहार मुख्यन्यायमुर्तींकडून करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाने दाखविलेल्या अनास्थेबाबत नाराजी.
- सर्किट बेंच प्रश्नी 7 ऑक्टोंबर रोजी वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणे. सहा जिह्यात एकाच वेळी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना निवेदन देणे.
- ऑक्टोंबर अखेर पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास सहा जिह्यांचा दौरा करुन वकील परीषद घेवून न्यायालयीन कामकाजापासून बेमुदत अलिप्त राहणे.
मुख्यमंत्र्यांना आता एकाच ओळीचे पत्र
खंडपीठ कृती समितीने यापुर्वी दिलेली निवेदन जिल्हाधीकारी कार्यालयाकडे असल्याचे माहिती अधीकारातून समोर आले आहे. यामुळे आता ‘माननीय मुख्यमंत्री यांनी 1 कोटी 50 लाख जनतेच्या कोल्हापूर सर्किट बेंच प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी आपला बहुमुल्य वेळ काढाव़ा अशा आशयाचे केवळ एकच ओळीचे पत्र मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे.
बैठकीतील महत्वाच्या सुचना
- लोकप्रतिनिधींवर आंदोलन किंवा सनदशिर मार्गाने दबाव आणणे
- प्रत्येक जिल्हयातील बारच्या पदाधिकाऱयाने आपआपल्या जिह्यातील तालुक्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून दबाव आणणे.
- प्रत्येक बारने सर्वसाधारण सभा घेवून त्यामध्ये ठराव करुन तो मुख्यमंत्र्यांना पाटवण्यात यावा
- 2 ऑक्टोंबर पासून मुंबई आझाद मैदान येथे चक्रीय आंदोलन
- 55 दिवस बंद पेक्षा अधीक तीव्र लढा उभारणे
- लाक्षणीक उपोषण करणे