महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात वेळेवर आणि प्रामाणिकपणे वीज बिल भरण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. त्यामुळे इतर जिल्हय़ापेक्षा वेगळा मापदंड वापरून कोल्हापूर जिल्हा संपूर्णपणे भारनियमनमुक्त करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी महावितरणकडे केली आहे.
महावितरणचे मुख्य अभियंत्यांकडे सोमवारी कदम यांनी निवेदन सादर केले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, महापालिकेतील भाजपचे माजी विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, माजी नगरसेवक राजसिंह शेळके उपस्थित होते.
निवेदनात कदम यांनी म्हटले आहे की : ऐन उन्हाळय़ात वीजेची प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच कोळश्याच्या तुटवडय़ामुळे वीज निर्मिती घट देण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हय़ात सध्या शहरी भाग वगळून ग्रामीण भागात भारनियमन सुरू केले आहे. औद्योगिक व शेतीपंप ग्राहकांना वगळून इतर ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ऐन उन्हाळय़ात जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हय़ात महावितरणच्या बाबतीत सकारात्मक बाबी आहेत. वीज बिल वसुलीत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्हय़ाची थकबाकी राज्यात सर्वात कमी आहे. वीज चोरीचे प्रमाणही इतर जिल्हय़ाच्या तुलनेत नगण्य आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱया कोल्हापूर जिल्हय़ाला वेगळा मापदंड लावून भारनियमनमुक्त करावे.
पोटनिवडणूक निकालानंतर कदम लागले पुन्हा कामाला
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम लढले. त्यांना पराभव पत्करावा लागला. निवडणूक निकालानंतर न थांबता कदम यांनी पुन्हा कामाला सुरूवात केली. वीजेच्या भारनियमनाचा प्रश्न घेऊन ते सोमवारी महावितरणकडे केले.