ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली आहे. ही यात्रा सुरु झाल्यापासून राहुल गांधींबरोबर यात्रेत लाखो लोक जोडले जात आहेत. या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांचा अभूतपूर्व सहभाग आणि अमाप उत्साह यावेळी पहायला मिळत आहे, असे मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले. ते कोल्हापुरात काँग्रेसच्या नफरत छोडो, भारत जोडो मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलताना थोरात म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यामुळे संताच्या महाराष्ट्राने नेहमीच समतेचा संदेश दिला आहे. ही समता आणि बंधुता टिकली पाहिजे, हा संदेश घेऊन राहुल गांधी संपूर्ण भारतभर जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असे थोरात म्हणाले. तसेच युगपुरुषांच्या विचारांना ताकद देणारी ही यात्रा आहे, समतेचा विचार टिकवण्यासाठी लढले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
पुढे थोरात म्हणाले, २०१४ ला देशात भाजपची सत्ता आली तेंव्हापासून देशाची समता बिघडत आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. माणसाला माणसापासून वेगळं केले जातंय, धर्मापासून वेगळे केले जात आहे. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केला जातोय, अशी टीका यावेळी थोरात यांनी भाजपवर केली.
हे ही वाचा : देशाच्या भल्यासाठी राहुल गांधींची पायपीट- सतेज पाटील