कोल्हापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे इच्छूकांच्या मनात आता धडकी भरली आहे. कारण अनेक कार्यकर्ते स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत होते. शिवाय कोल्हापूर मध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वारंवार कोल्हापूर महानगर पालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असे जाहीर पाने सांगितले होते. मात्र थोरातांच्या या विधानामुळे इच्छूकांची गोची होण्याची शक्यता आहे.
खासदारकीचा टर्म संपल्यानंतर ३ मे नंतर माझी भूमिका जाहीर करणार असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्यावर महसूलमंत्री बाबासाहेब थोरात यांनी मात्र बोलण्यास नकार दिला.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करावा, असे आदेश दिले होते. त्यावर बोलताना थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे. त्याबाबत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. मात्र मी तिथं नाही. पावसाळा सुरू होतोय, या काळात कशा निवडणुका घेता येतील? याची चर्चा सुरु आहे. शेतीची कामही सुरू होतात. त्यामुळे काय करायचं? हे राज्य निवडणूक आयोग निर्णय घेईल. त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि राज्य निवडणूक आयोग ठरवेल. असे थोरात म्हणाले. राज ठाकरे हा विषय सामाजिक म्हणत असतील पण ते राजकारण करत आहेत. पण महाराष्ट्रातील जनता समजदार आहे. सामाजिक सलोखा जपण्याचं काम जनतेनं केलंय. अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.