माणगाव ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे देशातील पहिला अभिनव उपक्रम साजरा होत आहे. ‘हर घर तिरंगा’ बरोबरच ‘हर घर संविधान’ या उपक्रमातंर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला तिरंगा ध्वज आणि भारताच्या संविधानाची प्रत दिली जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी पत्रकाद्वारे दिली.
सरपंच मगदूम म्हणाले, माणगाव ही भूमी राजर्षी शाहूजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रामुख्याने अनिष्ठ विधवा कुप्रथा बंधीचा ठराव माणगाव ग्रामपंचायतीने केला असून या ठरावाची अंमलबजावानी 1 मे पासून गावातील ग्रामस्थांनी केली आहे. विधवा महिलांना मान सन्मान मिळावा या हेतूने माणगाव ग्रामपंचायतीने जाहीर केल्यानुसार 14 व 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रतीकात्मक सरपंच व उपसरपंच म्हणून गावातील विधवा महिलांची निवड करून त्यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करणेत येणार आहे. त्या दिवशी ग्रामसभेचे अध्यक्षपदी तीच महिला असणार आहे.
सरपंच, उपसरपंचांचा मान ग्रामस्थांना
मगदूम म्हणाले, या ग्रामसभेमध्ये सोडत काढण्यात आली त्यामध्ये अनुक्रमे दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी प्रतीकात्मक सरपंच म्हणून वंदना गौतम जाधव व प्रतीकात्मक उपसरपंच म्हणून प्राजक्ता संतोष पोवार तसेच 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रतीकात्मक सरपंच म्हणून सपना सुनील पाटील यांची सोडतद्वारे निवड करण्यात आलेली आहे. गावातील वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या गावातील 75 जेष्ठ नागरिकांचा यथोचित मान सन्मान ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येणार आहे. गावातील युनियन बँक ते शिव तीर्थ पर्यंतच्या सहाशे मीटर मार्गावर दुतर्फा तिरंगा ध्वज फडकाऊन रोडच्या कडेला असणाऱया भिंतीवर तिरंगा लाईट इफेक्ट्स केला जाणार आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, ग्रामपंचायत इमारत, शिवतीर्थ या ठिकाणी तिरंगा विद्युत रोषणाई करणेत येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त गावातील ग्रामस्थांनी आपआपल्या घरासमोर रांगोळी घालण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले आहे.