पानलाईनच्या एका व्यापाऱ्याने मांडली भावना; खराब रस्ता, धुळीचा त्रास किती दिवस सहन करायचा केला प्रश्न ,व्हायरल पोस्टने खराब रस्त्यांची ऑनलाईन चर्चा
प्रतिनिधी,कोल्हापूर
शहरातील खड्डय़ांमुळे नागरिकांना आरोग्यविषयी समस्यांना,विकारांना सामोरे जावे लागत आहे.अनेकांच्या मागे दवाखाना लागला आहे.पाठदुखी,कंबरदुखी,मानदुखी,पायदुखी आदी विकारांवर उपचार घेण्याची वेळ आली आहे.खराब रस्त्यातील धूळही जीवघेणी ठरत आहे.त्यामुळेही अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे.खराब रस्त्यांचा त्रास वाहनधारकांना,पदचाऱ्यांना होतोच पण तो रस्ते परिसरात राहणाऱ्यां नगारिकांसह दुकानदार,व्यावसायिकांनाही होताना दिसतो.या साऱ्या चिंताजनक वातावरणात पानलाईनवरील एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोरच्या रस्त्यामुळे होणारे हाल सहन करत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये संबंधित व्यापाऱ्याने व्यक्त केलेली भावना महापालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
त्या व्यापाऱ्या ची पोस्ट त्याच्याच शब्दात :
मी एक व्यावसायिक.सर्व प्रकारचे टॅक्स भरतो,कार्पोरेशनचे टॅक्सही भरतो.तरीही माझ्या दुकानात बसायला मला भीती वाटते,कारण ‘रस्ता’. अर्धवट झालेल्या रस्त्यामुळे आम्हा व्यापाऱ्याxना दम्याचा (अस्थमा) त्रास सुरू झाला आहे.त्याच बरोबर मालाचीही नासधूस होते.किती दिवस हा त्रास सहन करायचा. कार्पोरेशनचे लायसन्स रिन्युव्ह करायला एक महिना लेट झाला तर लगेच दंड होतो,घरफाळा लेट झाला तर लगेच 18 टक्के व्याज लागत,तर या रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा दंड कोण वसुल करणार?,आज पर्यंत वाटत होत नगरसेवक पैसे खातात.त्यामुळे रस्तेच होत नाहीत किंवा रस्ते चांगलेच होत नाहीत,आता महापालिकेत प्रशासकराज असल्याने नगरसेवकही नाहीत मग रस्ते न होण्यामागची कारणे काय असतील?
आता हे मी बोलतोय हे कोल्हापुरातील मेन दोन रस्ते जे महानगरपालिकेच्या आजुबाजुला आहेत. कदाचित महानगरपालिकेतिल सर्व कर्मचारीवर्ग व अधिकारी लोक रोज या रस्त्यावरून ये जा करत असतील तर यांना ही रस्त्याची दूरवस्था दिसत नसेल का? अजुन किती दिवस आम्ही आमची फुप्फुस बाद करायची ?कृपया कोल्हापूर महानगरपालिकेने लवकरात लवकर याची दखल घ्यावी .