कोल्हापूर/यशवंत लांडगे
शिवसेनेच्या फुटीनंतर निष्ठावंत कोण, यावरुन राज्यात सेनेचे दोन गट एकमेकांना भिडले आहेत. अनेक ठिकाणी आमदार विरूध्द पदाधिकारी असा संघर्ष पहायला मिळत आहे. मग शिवसेनेला गटबाजीची परंपरा असलेला कोल्हापूर जिल्हा तर यात कसा मागे राहील. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार हे पक्षांतर्गत विरोधक या यानिमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. निष्ठावंत कोण? यावरून सुरू असलेला या दोघांतील हा वाद तसा जुनाच आहे. फक्त आता सेना अणि शिंदे गट यांच्या आडून हा संघर्ष पुन्हा एकदा नव्याने उफाळला आहे.
शिवसनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील अनेक वर्षापासूनचा वाद पारंपरिक राजकीय शत्रू असल्यासारखाच आहे. विरोध, आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यातून पक्षांतर्गत वाद वारंवार चव्हाटय़ावर आल्याचे जिल्हय़ाने अनेकवेळा पाहिले आहे. एकाच विषयावर दोघांची वेगवेगळी आंदोलने आणि एकाचवेळी दोघांच्या वेगवेगळय़ा बैठका त्यामुळे कोणाच्या सोबत जायचे, यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही अनेकदा गोची झाली आहे.
शिवसेना स्थापनेनंतरची काही वर्षे वगळता नेत्यांची गटबाजी, संपर्कप्रमुखांची बोटचेपी भूमिका आणि कार्यकर्त्यांची गोची अशी परिस्थिती शिवसेनेची जिल्हय़ात राहिली आहे. मुळात शिवसेना आणि गटबाजी असे जणू समिकरणच जिह्यात झाले आहे. तीनवेळा सत्तेत येऊनही गटबाजीला लगाम घालण्यात नेते अयशस्वी झाल्याने कार्यकर्त्यातूनही नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जिल्हय़ाकडे पाहिले जाते. जिल्हय़ाने शिवसेनेला एकाचवेळी सहा आमदार देण्याची किमया केली आहे. पण आमदार व जिल्हाप्रमुखांचे फारसे सख्य नसल्याचेच चित्र वारंवार समोर आले. अपवाद वगळता शहरात तर आमदारकीच्या रूपाने नेहमीच शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. पण पक्षीय राजकारणात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांचे बिनसल्याचेच चित्र आहे. जिल्हाप्रमुख व आमदार यांच्यातील वाद अगदी टोकाला गेल्याचीही उदाहरणे आहेत.
लोकप्रतिनिधी पक्षवाढीसाठी काम करत नाहीत, ही पदाधिकाऱयांची ओरड कायम राहिली आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी असा संघर्ष सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात पहायला मिळत असला तरी खरा टोकाचा वाद आहे तो कोल्हापूर शहरात राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यात. अनेक वर्षे धुमसत असणाऱया या वादावर नेत्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण तो तोडगा वरवरचा असल्याचे नंतर स्पष्ट झाले आहे. हा वाद अनेकदा इतका टोकाला गेला की, वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठी धुसफुस होते. निष्ठावंताना डावलल्याचा आरोप होतो. निवडणुका आल्या की पक्षाचे नुकसान नको म्हणून वरुन आदेश आल्यानंतर दोघेही शांत होतात. पण निवडणुकीच्या परिणामानंतर ही शांतता वरवरची असल्याचे स्पष्ट हेते. सोयीचे राजकारण केल्याची चर्चा होते आणि निवडणुकीत व्हायचा तोच परिणाम होतो.
गत विधानसभेला शिवसेनेचा नामुष्कीजनक पराभव झालाच, शिवाय महापालिकेतही शिवसेनेला हाताच्या बोटांवर मोजता येणाऱया जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशाला गटबाजी हेच कारण जबाबदार असतानाही नेतेमंडळी त्यातून कोणताही बोध घेत नाहीत. राज्यातील फुटीनंतरही निष्ठावंत कोण, हा मुद्दा पुढे आलाच. त्यातून सर्वत्र आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून आपणच खरे शिवसैनिक असल्याचे दाखवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. कोल्हापुरात मात्र हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर गेला आहे. पक्षाची कुणी कशी वाट लावली, हे सांगताना कुणी कशी गद्दारी केली, हेही सांगून एकमेकांचा उध्दार केला जात आहे. हॉटेलच्या बिलापर्यंत आलेला हा विषय आणखी कुठंपर्यंत जाणार, हे येणारा काळच ठरवेल.
नेत्यांचा सन्मान, कार्यकर्त्यांना संधी कधी
एका बाजूला राजेश क्षीरसागर यांना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद, तर दुसऱया बाजूला जिल्हाप्रमुख संजय पवार यांना आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष ही मंत्री दर्जाची पदे तसेच पवार यांनाच राज्यसभेचे तिकीट तर मुरलीधर जाधव यांना ‘गोकुळ’चे शासकीय संचालकपद देऊन शिवसेनेने त्यांचा योग्य सन्मान केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याउलट अनेक कार्यकर्ते कोणत्याही शासकीय पातळीवरील पदाशिवाय प्रामाणिक काम करत असल्याचे काहीजणांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले.