अग्नीपथ योजनेविरोधी आंदोलनात केंद्रसरकारवर सडकून टीका; अग्निपथ विरोधी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार
सांगरूळ / वार्ताहर
केंद्रातील भाजप सरकारच्या दिशाहिन राजकारभारामुळे देशासमोर अनेक संकटे उभी राहत आहेत. देशातील सर्वसामान्य जनतेबद्दल कोणत्याही प्रकारचे देणेघेणे नसणाऱ्या या सरकारने देशात अनेक चुकीच्या योजना सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या संवेदनशील क्षेत्रात सैन्यभरतीत अग्निपथ योजना आणून लाखो युवकांच्या स्वप्नांचा चक्काचूरा करत मोदी, शहाची जोडी देश बरबाद करायला निघाली असल्याची टीका आ. पी. एन. पाटील यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश कमिटीने केलेल्या अग्नीपथ योजने विरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाची दिलेल्या हाकेनुसार फुलेवाडी येथील अमृत हॉल मध्ये झालेल्या तरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले प्रत्येक क्षेत्रातील कंत्राटीकरणाचे धोरण राबवताना तरुणांच्यात अविश्वास निर्माण करण्याचे भाजपचे काम सुरू आहे. मोदी शहा जोडी भविष्यात कोणता कायदा व धोरण राबवतील याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने शेती, उद्योग धंद्यासाठी कर्ज घेण्यासाठी कोणी पुढे येईनात. काही करून सत्ता हस्तगत करायची व काँग्रेसच्या विरोधात गरळ ओकायची ही निती भाजप अवलंबत आहे. पण काँग्रेसने आपल्या राजवटीत लोकहिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना सरकारचे संरक्षण कसे देता येईल याकडे सातत्याने लक्ष दिले आहे. भाजपने सत्ता येताच काँग्रेसच्या सर्व योजना. मोडून रेल्वे पासून बँका पर्यंत सर्व क्षेत्रात खाजगीकरण व कंत्राटीकरणाला सुरुवात केली आहे. पण काँग्रेसने सत्य व अहिंसेच्या मार्गाने १५० वर्षे राज्या करणाऱ्या ब्रिटिशांना पळवून लावले आहे. आता पुन्हा या मोदी शहांना काँग्रेसच्या धोरण व तत्वाने पराभूत करण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना योगेश कांबळे यांनी सैन्य भरतीसाठी सराव करताना ग्रामीण भागातील युवक रक्ताचे पाणी करत आहे. पण अग्नीपथ योजनेतून केवळ चारच वर्षे नोकरी मिळणार असेल तर काय उपयोग म्हणून अनेक इच्छुक युवकांनी सराव थांबवला आहे. सरकारच्या या योजनेला रस्त्यावर उतरून विरोध करूया असे सांगितले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी शेतकरी विरोधी कायदे करण्याबरोबर सैन्याचे खाजगीकरण करणारे हे देशातील पहिले सरकार असल्याची टीका केली.
यावेळी करवीर पंचायत समिती माजी सभापती अविनाश पाटील, सचिन पाटील, बबलू पाटील राकेश काळे,निवास कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, माजी जि.प. सदस्य बी. एच. पाटील, हिंदुराव चौगले, पी.डी. धुंदरे, जिल्हा बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, शंकरराव पाटील, सर्जेराव पाटील, अमर पाटील यांचेसह करवीर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .