जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा
कोल्हापूर / प्रतिनिधी
नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणेसाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी काढणेसंदर्भात शासनाने आदेश काढलेला नाही. तशी कोणतीही स्पष्टता संबंधित विभागाने दिलेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 13 जुलै रोजी पूर्ण ताकदीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मा. खा. राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकार्यांची आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, दोन दिवसापुर्वी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाने नियमित कर्ज भरणार्या अनुदान देण्यासाठी जाचक नियम व अटी रद्द करून शासनाच्या प्रचलीत नियमाप्रमाणे नियमीत कर्ज भरणार्या सर्व शेतकर्यांना 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय झाल्याचे सांगितले होते. दरम्यान दि. 28 जुलै रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या सुधारित निर्णयाला मान्यताही घेण्यात आलेली होती. परंतु विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले, की अल्पमतात आलेल्या सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय हे लागू होत नाहीत. तसेच ते नियमाच्या चाकोरीत बसत नाहीत. त्यामुळे नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांच्या खात्यावर जे 50 हजार रूपये भेटणार होते. त्यांना ते पैसे आले नाहीत. मी स्वतः या संदर्भात मंत्रालय स्तरावर चौकशी केली असता हा निर्णय नव्याने घेतला तरच शेतकर्यांना पैसे मिळणार आहेत. त्या संदर्भात नव्याने अद्याप निर्णय न झाल्याने शेतकर्यांच्या खात्यावर पैसे मिळालेले नाहीत. दोन रेड्यांच्या टकरीत भिंतच उद्ध्वस्त होते, अशी अवस्था नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या खात्यावर पैसे मिळणे आता अशक्य झालेले आहे.
सध्या पेरणीचे दिवस आहेत. वास्तविक पाहता त्या निर्णयानुसार 1 जुलै रोजी निकष लावून देखील ज्या शेतकर्यांना पैसे मिळणार होते. त्या कोणत्याही शेतकर्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रासायनिक खतांचे दर भरमसाठी वाढले आहेत. पुढील खरीप पिकांच्या नियोजनासाठी शेतकर्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी पैसे मिळणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा ठप्प आहे. यासाठी नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांच्या खात्यावर कोणतेही निकष न लावता तातडीने पैसे वर्ग करावेत, ऊस उत्पादक शेतकर्यांना बिद्री कारखान्याच्या धर्तीवर 200 रूपयेचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, तसेच रासायनिक खतांचे वाढलेले दर तातडीने मागे घ्यावेत. या तीन मागण्यांसाठी 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र गड्ड्यान्नावर, वैभव कांबळे, जयकुमार कोले, विठ्ठल मोरे, अजित पोवार, बाळासाहेब पाटील, तानाजी देसाई, सागर संभूशेटे, सुरेश म्हाऊंटकर, राजाराम देसाई, सागर कोंडेकर, धनाजी पाटील, राम शिंदे, राजेश पाटीलस विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.