13 मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोनामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणारे महापालिकेतील कर्मचारी गेले वर्षभर प्रशासनाकडे विविध मागण्या करत आहेत. कर्मचारी संघटनेच्यासोबतच्या बैठकीत केवळ चर्चा होत असून अंमलबजावणी काहीच होत नाही. त्यामुळे मनपा कर्मचारी आक्रमक झाले आहेत. 22 मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर 13 मे पासून बेमुदत संपावर जात असल्याची नोटीस कर्मचारी संघटनेने मंगळवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिली आहे.
यानंतर महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मनपातील कर्मचाऱयांच्या प्रश्नांबाबत दर महिन्यांना कर्मचारी संघाची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक होते. गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱयांच्या 22 मागण्याबाबत बैठकीत चर्चा केली जात आहे. प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. गेले वर्षभर सफाई आणि झाडू कामगारांना घमेली, खराटे असे साहित्यच मिळालेले नाहीत. किंबहूना प्रशासनाने हे साहित्यच खरेदी केलेले नाही. अशा स्थितीत कर्मचारी काम कसे करतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 6 टक्के महागाईचा फरक मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, आचारसंहितेच कारण पुढे करून तो देण्यास नकार दिला. आचारसंहिता झाली तरी फरक दिलेला नाही. निवृत्त होणाऱयांपैकी अनुकंपावरील दरवर्षी 20 टक्के वारसांना नोकरीस घेणे बंधनकारक आहे. वर्ष झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी आता आक्रमक झाले असून 22 मागण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 13 मे रोजी पासून अत्यावश्यक सेवा वगळून बेमुदत संपावर जाणार आहे. अडीच हजार पेक्षा जास्त कर्मचारी यामध्ये सहभागी होतील. यावेळी कर्मचारी संघाचे विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, अजित तिवले, अनिल साळोखे, अभिजित सरनाईक आदी उपस्थित होती.
1800 पदे रिक्त, मग कामे कशी होणार?
मनपामध्ये 1984 शेडय़ूल्डवरच अद्यपही कामकाज सुरू आहे. निवृत्तीनंतर त्या पदावर भरती झालेली नाही. 4 हजार 754 पदे मंजूर असताना 2 हजार 900 कर्मचारी कार्यरत आहेत. 1800 जागा रिक्त आहेत. वास्तविक सध्याच्या घडीला लोकसंख्या वाढली असून काम वाढले आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याचे मनपा कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी अजित तिवले यांनी सांगितले.
सहा वर्षापासून गणवेशची प्रतिक्षा
मनपातील कर्मचाऱयांना दरवर्षी गणवेश दिले जातात. मात्र, 2016 पासून गणवेश दिलेले नाहीत. न्यायालयामध्ये कर्मचारी संघाच्या बाजून निर्णय झाला असतानाही कार्यवाही होत नाही, हे दुर्देवी असल्याची खंत संजय भोसले यांनी व्यक्त केली.
प्रमुख मागण्या
-सहा टक्के महागाई फरक तत्कळा द्यावा.
-कर्मचाऱयांना वेळच्यावेळी साहित्य मिळावे.
-रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया जलद गतीने राबवा.
-अनुकंपावरील आणि रिक्त पदे ताबडतोब भरावीत.
-निवृत्तीनंतर ग्रॅज्युटेची रक्कम, पेन्शन त्वरीत सुरू व्हावी.-पगार, पेन्शन वेळेवर मिळावा.