संतोष पाटील,कोल्हापूर
कोल्हापूर महापालिका आयुक्त सद्यस्थितीत प्रशासक हे मानाचे तितकंच आव्हानात्मक पद.मात्र शाहूनगरीला तीन महिन्यांपासून शासनाला प्रशासक देता येत नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही.महापालिका सध्याची आणि प्रस्तावित असा सुमारे पाचशे कोटी रुपये निधीची रक्कम आहे.यातून पद्धतशीरपणे वाटा काढून देणारा, महापालिकेत सत्ता आली नाही तरी पूर्णकाळ आपला शब्द प्रमाण मानून जी-जी करणारा ‘आपला माणूस’ असावा,असा कटाक्ष मध्यस्थींचा असल्याची चर्चा आहे.
थेट आयएएस पेक्षा सीओओ केडरचा नियमाला बगल देत कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांसह पदभाराचे मोल जाणणारा असावा, अशा अलिखीत अटी, शर्थी आयुक्तपदासाठी आहेत. या चाळणीतून गाळण होईना.. अन् दरही ठरेना.. त्यामुळेच कोल्हापूर प्रशासकाचं घोड अडल्याचे उघडपणणे दिसणारं वास्तव आहे.
महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रथम आयुक्त व्दारकानाथ कपूर यांनी विकास आराखड्याच्या माध्यमातून मोठं खेडं असलेल्या कोल्हापूरचा तोंडावळा शहराकडे वळवला. त्यानंतर कुणाल कुमार यांनी केंद्राकडे पाठपुरावा करुन हजारो कोटींचा निधी कोल्हापुरात आणला. डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला कमालीची शिस्त लावली. लोकाभिमुख कारभार सुरू केला. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी लोकसहभागातून शहर स्वच्छतेचा अनोखा उपक्रम यशस्वी करुन दाखवला. महापालिकेत सर्वाधिक प्रशासक म्हणून मान मिळवलेल्या डॉ. कादंबरी बलकवडे यांची कारकीर्द कोल्हापूरकरांचे आरोग्य जपण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात दीडशे कोटींनी भर करणारी ठरली. कोल्हापूर महापालिकेतील आयुक्तपद हे काटेरी मुकुट परिधान केलेल्या राजासारखी अवस्था असणारे पद मानले जाते. जेमतेम उत्पन्न, सजग शहरवासीय, कचरा-जलप्रदूषणाचे आव्हान, महापालिकेला राज्य-केंद्र सरकारकडून कोट्यावधींचा निधी खेचून आणेल आणि त्याचा प्रामाणिकपणे उपयोग व्हावा, अशी मानसिकता असलेल्या नेतृत्वाचा अभाव यामुळेच महापालिकेचं आयुक्तपद अजूनच कसरतीचं काम ठरते.
महापालिकेचं उत्पन्न जेमतेम साडेतीनशे कोटींचं आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून वसुलीचे प्रयत्न केले तरच उद्दीष्ट साध्य होते. येथील यंत्रणेला सांगाल तितकेचं काम करायची सवय आहे. शहरात कचरा प्रश्न, खराब रस्ते, नियमित वसुली, धोरणात्मक निर्णय आदींचे प्रश्न आवासून पडले आहेत. अशा स्थितीत महापालिकेला तीन महिन्यांपासून प्रशासक देता का प्रशासक.., असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही वेळ का आली, याचीही उघड चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेत सध्या आलेला आणि पुढील काही महिन्यांत येणारा निधी सुमारे पाचशे कोटींच्या घरात आहे. यातील टक्केवारीचा वाटा अलगद काढता येईल, निविदा प्रक्रिया राबवताना सोयीच्या अटी, शर्थी घालताना अटकाव न करणारी व्यक्ती प्रशासक असावी. या खुर्चीवर बसवणाऱ्या व्यक्तीने त्याचे मोल आगावू दिले पाहिजे, हा पहिला कटाक्ष आहे. असे मोल जाणणारे डझनभर रांगेत उभे आहेत. प्रामाणिक असलेला थेट आयएएस अधिकारी स्वत:च्या नियमानुसार काम करतो, राजकीय दबाव घेत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कोल्हापुरात थेट आयएएस अधिकारी ऐवजी सीईओ केडरचाइ अधिकारी असावा, असाही मतप्रवाह आहे. जेणेकरून महापालिका आणि विधानसभा निवडणुकीनंतरही सत्ता येवो अगर न येवो आपले उपकार माणून शब्द प्रमाण मानणाऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप संपलेला नाही.
आयुक्त हवा की एजंट….
या खुर्चीवर बसणारा अधिकारी नव्हे आपला एजंट असावा, अशी काहींची भावना आहे. स्वाभिमान गहाण ठेवून पॉलिटिकल गॉडफादरच्या चरणी निष्ठा वाहण्राऱ्यांची संख्या कमी नाही. सत्तातरानंतर एका रात्रीत निष्ठा बदलणारे अधिकारी कोल्हापूरने पाहिले आहेत. अस्थिर राजकीय स्थितीत प्रशासनावर आपली हुकुमत कायम राखू ठेवणारा अधिकारी हवा असावा. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिका आणि शहराचं हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले होते. अनेक निर्णय प्रलंबित ठेवले होते. आता यातील स्वहिताचे तसेच पॉलिटीकल गॉडफादरच्या सुचनेनुसार निर्णय फिरवण्यासाठी बदलण्यासाठी यंत्रणा सक्रीय झाल्याचे चित्र आहे.
शहरातील प्रश्नांची उत्तरे सापडेनात….
पंधरा दिवसांपूर्वी शहरात पूरस्थितीनंतर दुर्गंधी, कचरा उठावाचा प्रश्न निर्माण झाला. महापालिका प्रशासकीय व्यवस्था सुस्तावलेली आहे. नियमित कामकाजावर लक्ष ठेवणारी सुपरपॉवर नसल्याने अखेरची दाद कोणाकडे मागायची, असा नागरिकांपुढे प्रश्न आहे. महापालिका प्रशासकाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आहे. त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे महापालिका व्यवस्थेकडे त्यांना लक्ष देणे शक्य होत नसावे. महापालिका अधिकाऱ्यांच्या रात्री दहा ते मध्यरात्रीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होतात. दिवसभर काम केल्यानंतर रात्री बारा-बारा वाजेपर्यंत निर्णयासाठी ताटकळत बसावे लागते. याचा दुसऱ्या दिवशीच्या कामावरही परिणाम होत असल्याची तक्रार अधिकारी खासगीत करत आहेत. यातून शहरातील प्रश्नांची सोडवणूक थांबली आहे.