7 हजार 231 फेरीवाल्यांना 9 कोटी 12 लाखांचे कर्जाचे वाटप : 20 फेरीवाल्यांनी घेतले प्रत्येकी 50 हजारांचे कर्ज : कोरोनातून सावरण्यासाठी योजना ठरली प्रभावी
विनोद सावंत/कोल्हापूर
कोरोनामध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या फेरीवाल्यांना अर्थसहाय करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी.एम.स्वनिधी) योजना सुरू केली. यामध्ये 1 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱया महापालिका गटात राज्यात सर्वाधिक कर्ज वितरित करणारी कोल्हापूर महापालिका ठरली आहे. कोल्हापूर महापालिकेने दोन वर्षात 7 हजार 231 फेरीवाल्यांना तब्बल 9 कोटी 12 लाख रूपयांचे कर्ज दिले आहे. दुसऱया क्रमांकावर सोलापूर महापालिका आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे पथविकेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. व्यवसायच बंद राहिल्याने उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करायचे हा त्यांच्या समोर प्रश्न होता. निर्बध शिथिल झाल्यानंतर भांडवल नसल्याने पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचे आव्हान होते. या सर्वचा केंद्र शासनाने गांभिर्याने विचार करत जून 2020 मध्ये पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी.एम.स्वनिधी) योजना सुरु केली. ही योजना कोल्हापुरातील फेरीवाल्यांना आधार ठरली. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक कर्ज कोल्हापूर शहरात वितरित झाले.
मुदतीत कर्ज फेडणाऱयांना 7 टक्के अनुदान
आत्मनिर्भरमधील कर्जाचा व्याजदर हा बँकाच्या प्रचिलित व्याजदराप्रमाणे आहे. तसेच कर्जाचा लाभ घेणाऱया कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास फेरीवाल्यास 7 टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतात. व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात प्रत्येक तीन महिन्याने जमा केली जाते. तसेच डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱया विक्रेत्यांना 1200 पर्यंतची कॅशबॅक सुविधा देखील आहे.
योजनेस पात्र फेरीवाले
कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पथविक्रेता सर्वेक्षणमधील पथविक्रेते तसेच सर्वेक्षणापासून वंचित राहिलेले परंतु 24 मार्च 2020 पूर्वीचे पथविक्रेते आणि सेवा पूरवठदार (केश कर्तन दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने )
कर्जाचे टप्पे
पहिले कर्ज -10 हजार
दुसरे कर्ज -20 हजार
तिसरे कर्ज-50 हजार
‘आत्मनिर्भर’ योजनेला सुरवात-जुन 2020
फेरीवाल्यांचे कर्जासाठी आलेले अर्ज-7858
कर्ज मंजूर झालेले फेरीवाले -7490
कर्ज मिळालेले फेरीवाले-7231
दहा हजार कर्ज घेतलेले लाभार्थी -5375
वीस हजार कर्ज घेतलेले लाभार्थी -1836
50 हजार कर्ज घेतलेले लाभार्थी -20
मनपाचे उद्दिष्ट पूर्ण
‘आत्मनिर्भर’ योजनेसाठी कोल्हापूर शहरातून 7 हजार 858 कर्ज मागणीसाठी अर्ज आले होते. यामध्ये 7 हजार 490 फेरीवाल्यांचे प्रकरणे मंजूर असून 7 हजार 231 फेरीवल्याना 9 कोटींचे कर्ज वितरित झाले आहे. राज्य शासनाने 6 हजार 600 फेरीवाल्यांना कर्ज देण्याचे दिलेले उद्दिष्टे मनपाने पूर्ण केले असून राज्यात आघाडीवर आहे. – निवास कोळी व्यवस्थापक, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, महापालिका