शहर कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद
कोल्हापूर प्रतिनिधी
पक्ष नेत्यांमुळे नव्हे तर कार्यकर्त्यांमुळे मोठा होत असतो, निवडणुका जिंकत असतो. भाजप हा कार्यकर्त्यांच्या बळाव मोठा झालेला पक्ष आहे. त्यामुळे निवडणुका जिंकून पक्षाची सत्ता आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. आगामी महापालिका, जिल्हापरिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी आणि जिंकण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. भाजपची सत्ता आल्यानंतर चंद्रकांतदादा प्रथम बुधवारी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर भाजपच्या शहर कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
अधिक वाचा- हिंदूहृदयसम्राट…भाजपच्या पोस्टरवर; बाळासाहेब ठाकरे यांच्या छबीचा चतुराईने वापर
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, विजय खाडे, विजय जाधव, राजू मोरे, संजय सावंत, मारूती भागोजी, गायत्री राऊत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी छोटेखानी भाषणात संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात घडलेले सत्तांतर अचानकपणे झालेले नाही. शिवसेनेत गेले अनेक दिवस खदखद होती. अनेक जण नाराज होते. काँग्रेस, राष्ट्रवादीविषयी नाराजी होती. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाराज आमदार बाहेर पडले. आता राज्यात सत्तांतर झाले आहे. भाजपचे सरकार सत्तेवर आले आहेत. गेली अडीच वर्षे सत्ता नसतानाही भाजप राज्यात जनहिताच्या कामात अग्रेसर होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपण नंबर वन होतो. यापुढेही ही नंबर वन कायम ठेवायचा आहे. त्यासाठी आतापासून कार्यरत राहा. आगामी काळात कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदेच्या महत्वाच्या निवडणुका आहेत. त्यात पक्षाला जिंकून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.