राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, हातकणंगले यांचा समावेश
२२ जुलैपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात
कोल्हापूर- पावसामुळे प्रभावित न होणाऱ्या तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी निवडणूक घेण्यास हरकत नाही, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतींसाठी शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व हातकणंगले या नगरपालिकांचा समावेश आहे. यासाठी १८ ऑगस्टला मतदान व १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी २२ जुलैपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा जिह्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २० जुलैला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. यानंतर २२ ते २८ जुलै दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधित राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उमेदवारी अर्ज भरण्यास उपलब्ध असणार आहे. तसेच २२ ते २८ जुलै दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधित हे उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष स्विकारले जाणार आहेत. तसेच या काळातील शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी हे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. २९ जुलैला सकाळी ११ पासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी दिनांक ४ ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी ३ पर्यंत असेल. तसेच अपिल असलेल्या ठिकाणी ८ ऑगस्टपर्यंत माघारीचा कालावधी असणार आहे. माघारीनंतर निवडणूक चिन्हे वाटप होऊन उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. १८ ऑगस्टला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तर १९ ऑगस्टला सकाळी १० पासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.