फॉर्मुला ठरला : नव्या संदर्भाने झालेली स्पेस भरुन काढण्याची रणनिती
राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नाराजांवर नजर
कोल्हापूर , संतोष पाटील
Kolhapur Political Marathi News : येत्या काळात शिंदे गटाची भाजपला पूरक अशीच राजकीय खेळी असेल, हे ऐव्हाना राज्यातील घडामोडीवरुन स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर जिल्ह्यात मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण झाल्याने त्यादृष्टीने सर्वपक्षीयांतील मोर्चेबांधणीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांसह विधानसभेच्या दहा जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. भाजपच्या थिंकटँकने याबाबतचे सुक्ष्म नियोजन केले असून महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या निमित्ताने भाजपचे मिशन टेन प्लस-टू सुरू होत असले तरी यातील अढथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
शिवसेनेत बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ओ देत सर्वात प्रथम माजी मंत्री आ.राजेंद्र पाटील यड्रावकर, आ.प्रकाश आबिटकर आणि राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातून सर्वात प्रथम जाहीर पाठींबा दिला. खा.संजय मंडलिक आणि खा.धैर्यशील माने हे दोघेही शिंदे गटात सामील झाले. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचीही दसरा मेळाव्यात भूमीका स्पष्ट झाली. डॉ.सुजित मिणचेकर यांचा दोन्ही व्यासपीठावर वावर आहे.तर उल्हास पाटील,सत्यजित पाटील तालुक्यातील घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.ए.वाय. पाटील यांच्यासह भाजप आणि शिंदे गटात सामील होवू शकतात याची चाचपणी सुरू आहे. शिवसेननंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजप-शिंदेगटाचा मोर्चा वळणार आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटाचे शिलेदार आणि भाजपची फौज विरुध्द उध्दव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी राजकीय धुळवड पहायला मिळेल.
कोल्हापूर महापालिका,जिल्हापरिषदेसह कोल्हापुरात किमान आठ ठिकाणी विधानसभा आणि दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकणे ही भाजपची मनिषा आहे.२०१३ पासून भाजप यासाठी पेरणी करत असले तरी २०१४ला मिळालेले यशही २०१९च्या निवडणुकीत भाजपला राखता आले नाही.आता शिंदे गटाच्या साथीने भाजपला यश दृष्टीक्षेपात दिसत आहे. एप्रिल महिन्यांत झालेल्या कोल्हापूर शहर उत्तरच्या पोट निवडणुकीतील प्रचाराचे तंत्र तसेच हिंदुत्वाचे कार्ड ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती.कोण-कोणत्या मुद्यावर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटासह दोन्ही काँग्रेस बॅकफुटवर जावू शकतील.भविष्यात एकसंघ भाजपचा सामना कसा करायचा याचा अंदाज बांधले जात आहेत. महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिंदे गट अशी दुरंगी अथवा काँग्रेस,शिवसेना-ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजप अशी चौरंग लढत पुढील काळात झाली, तरीही राज्यातील सत्ताकारणाच्या आधारे अधिकाधिक तगडे उमेदवार रिंगणात उतरवून कोल्हापुरातील राजकारणात वर्चस्व राहिल, सन्मानजनक जागा निवडून येतील अशी व्युहरचना भाजपची आहे.
जिल्ह्यात २०१९च्या निवडणुकीत सेना सहावरुन एकाजागेवर आली तरीही सहा आमदार आणि दोन खासदार निवडून आणण्याची क्षमता असल्याने कोल्हापूर हे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटासाठी स्पेस आहे. २०१९मध्ये भाजप विधानसभेच्या दोन जागावरून शुन्यावर गेली.तर काँग्रेस शुन्यावरुन चार आमदारांवर आली. राष्ट्रवादीने दोन जागा कायम राखल्या.शिंदे गटाच्या साथीने कोल्हापूर शहर आणि दक्षिण,शाहूवाडी-पन्हाळा,कागल,राधानगरी-भुदरगड,इचलकरंजी,शिरोळ या सात विधानसभेच्या जागांवर भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.चंद्रकांत पाटील,राजेश क्षीरसागर,आ.विनय कोरे,आ.प्रकाश आवाडे,आ. प्रकाश आबिटकर,आ.राजेंद्र पाटील-यड्रावकर,सुरेश हावळणकर,सत्यजित कदम,अमल महाडिक,समरजितसिंह घाटगे,अशी संभाव्य उमेदवारांची यादी भाजप-मित्रपक्षाची तयार आहे.ए.वाय.पाटील यांच्या सारखे तगडे मोहरे हेरुन त्यांना पक्षात आणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित बिघडवण्याचा डाव टाकला जावू शकतो.करवीरमधून चंद्रदीप नरके यांना भाजप आणि शिंदे गटाचे पाठबळ मिळेल.चंदगड विधानसभा मतदार संघात राजेश पाटील यांचा निर्णय महत्वाचा असेल.भाजपने मागील निवडणुकीत घेतलेली मते बेदखल करता येणार नाहीत.हातकणंगले तालुक्यात महाडिक गट आणि आ.विनय कोरे यांची भूमीका महत्वाची ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडे कागल व चंदगड असले तरी खा.संजय मंडलिक यांच्या बंडाने भाजपला बळ मिळू शकते.यापार्श्वभूमीवर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी.एन.पाटील यांना समझोता एक्सप्रेसचे डबे एकमेकाला घट्ट ठेवावी लागेल.संजय मंडलिक दुखावणार नाहीत याचीही काळजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घेताना दिसतात. शहर उत्तर आणि दक्षिण, करवीर, हातकणंगलेत काँग्रेसची मोठी ताकद आहे.मोजक्या जागा वगळता शिवसेनेला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार असल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
लोकसभेच्या दोन जागा खेचून आणण्यासह किमान सहा जागांवर विजयश्री खेचण्याचे मोठे आव्हान उध्दव ठाकरे यांच्या शिलेदारांपुढे असेल.बंडाळीनंतर शिंदे गटाच्या साथीने भाजपची जिल्ह्यातील फळी मजबूत झाल्याचे किमान कागदावरील तरी चित्र आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील बहूतांश मतदार संघात दमदार उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजपची शिंदे यांच्या बंडाळीमुळे शोध मोहीम संपली आहे.दहापैकी शिवसेनेची सहा व भाजप मित्रपक्षाची दोन विधानसभा मतदार संघात ताकद यापूर्वी सिध्द झाली आहे.या गणिताच्या आधारेच भाजपने जिल्ह्यात पुन्हा दहा अधिक दोनचे फासे टाकत आहे.
कोल्हापूरकर कोणाचेही गणित बिघडू शकतात…!
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाजूने सहानभूतीची लाट आहे.दोन लोकसभेसह सहा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा पर्यायाने ठाकरे यांचा चांगला प्रभाव आहे.यासह भाजपच्या संभाव्य विजयरथाच्या मार्गात आ.सतेज पाटील,आ.हसन मुश्रीफ,आ.पी.एन.पाटील यांची पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांचे जाळे प्रमुख अडथळा ठरणार आहे.कोल्हापूर लोकसभेसाठी गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी आतापासून तयारी केली आहे.राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदार संघात पर्याय ठरु शकतात.निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना एकत्रितपणे रणतिनी आखू शकतात.कोणाला निवडून आणण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठीच मतदान करत असल्याची प्रचिती यापूर्वीच्या निवडणुकांतून कोल्हापूरकरांनी दाखवून दिली आहे.कोल्हापूरच्या मतदारांचा ठाव लागत नसल्यानेच आघाड्या कागदावर कितीही गणित भक्कम वाटत असल्या तरी त्यांची गणित बिघडू शकतात.