महाडिक गटातील कार्यकर्त्यांचा विरोधकांना इशारा; जिह्यातील आगामी निवडणुकांमध्ये दिसणार चुरस
खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी राजकीय प्रवास सुरु; जिह्यातील राजकीय समीकरणे बदलणार
कृष्णात चौगले कोल्हापूर
‘आरंभ प्रचंड है…!’ या टॅगलाईनखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल करून नव्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. या टॅगलाईनद्वारे त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला असून याची आगामी काळातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रचिती येणार आहे. त्यामुळे भविष्यात ख-या अर्थाने राजकीय चुरस पहावयास मिळणार आहे.
लोकसभेपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीपर्यंत सलग तीन वर्षे महाडिक गटाला लागलेले पराभवाचे शुक्लकाष्ट राज्यसभा निवडणुकीतील विजयाने संपुष्टात आले. या विजयामुळे महाडिक गटाची अपयशाची मालिका खंडीत झाल्यामुळे मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यातील निवडणुकांमध्ये आरपारची लढाई होणार असल्याचे त्यांच्याकडून संकेत दिले जात आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपला अर्थाथ महाडिक गटाला बुस्टर डोस मिळाल्यामुळे आता या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजप असा तोडीस तोड सामना रंगणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आघाडी करून या निवडणुका लढवतील याची शक्यता कमी असून निश्चितच त्याचा भाजपला फायदा होणार आहे.
2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणनिती ठरविताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या ताकदीवर जिल्हा परिषद निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे ओळखून महाडिक गटाला सोबत घेऊन जनसुराज्य, ताराराणी आघाडी व रिपाई गटाची आघाडी केली. या ‘भाजता’ आघाडीला 25 जागा मिळाल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही 25 जागा मिळाल्या. यावेळी शिवसेनेने भाजप आघाडीला पाठींबा दिल्यामुळे भाजपच्या शौमिका महाडिक यांना जि.प.अध्यक्षपदाची संधी मिळाली. पण राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर लगेच कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्येही भाजपला पायउतार करून महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीच्या सत्ता कालावधीत भाजपवासी महाडिक गट राजकीयदृष्टय़ा बॅकपुटवर गेला. पण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिह्यातील लहान लहान घटक पक्षांना सोबत घेऊन स्थानिक पातळीवर तडजोडी करून पुन्हा कमळ फुलवण्याची जोरदार तयारी भाजप अर्थात महाडिक गटाने केली आहे. महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही हाच फॉर्म्यूला वापरला जाणार असून राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
आता लक्ष्य मिनी मंत्रालय
जि.प.च्या गत निवडणुकीत हातकणगंले तालुक्यात भाजपला निर्विवाद यश मिळाले होते. आता करवीर, पन्हाळा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ या तालुक्यांमधून भाजपचे बहुसंख्य जि.प.सदस्य निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, यांनी चंग केला असून युद्ध पातळीवर मोर्चेबांधणीही सुरु आहे. त्यासाठी मजबूत पक्षीय संघटनात्मक बांधणीही सुरु आहे.
तर महाडिकांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी
गोकुळ दुध संघाच्या माध्यमातून महाडिक गटाचे जिल्हाभर नेटवर्क आहे. तीन दशके जिह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असलेल्या या गटाकडे गेल्या काही वर्षात कोणतीही सत्ता नसताना कार्यकर्त्यांची फळी आजही भक्कम आहे. जिह्याच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील यांचे प्रबळ विरोधक म्हणून धनंजय महाडिक यांच्याकडे पाहिले जाते. तसेच जिह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी भविष्यातही भाजपकडे महाडिक गटाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आगामी काळात खासदार महाडिक यांना भाजपकडून केंद्रीय मंत्री मंडळातील महत्वाचे पद बहाल करून त्यांना उभारी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
विजय कार्यकर्त्यांना समर्पित
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अचूक नियोजनामुळे आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा मोठा विजय प्राप्त झाला आहे. मागील काही वर्षात सतत पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी एक दिवस खासदार धनंजय महाडिकांचा विजय निश्चित आहे, याची कार्यकर्त्यांना खात्री होती. या संघर्षाच्या काळात खंबीरपणे महाडिक गटासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना राज्यसभा निवडणुकीतील विजय समर्पित करतो.
शौमिका महाडिक – संचालिका, गोकुळ दुध संघ.