राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीची मागणी; पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षा निमित्त टपाल तिकीट व विशेष आवरण प्रकाशित करावे, अशी मागणी राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. बुधवारी या मागणीचे निवेदन रमणमळा येथील पोस्ट कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांना देण्यात आले. समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, बबनराव राणगे, अमित अडसुळे, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, अवधुत पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की : राजर्षी शाहू महाराज यांचे 2022 हे वर्ष स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यांच्या विचारांचा जागर देशभर व्हावा, यासाठी विविध उपक्रमांनी हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे केले जात आहे. सामाजिक समतेच्या विचाराने संपूर्ण आयुष्य मानवतेच्या भावनेने एक व्रतस्थ व्यक्तीमत्व म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी खर्ची घातले. मानवजातीच्या विकासासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन देशाला दिशा देण्याचे कार्य केले. राजा असूनही ऋषीतुल्य जीवन जगणाऱया लोकराजा राजर्षी शाहूंचा आदर्श समाजापुढे यावा, यासाठी या स्मृती शताब्दी वर्षात त्यांचे टपाल तिकीट व विशेष आवरण अखंड देशात प्रकाशित करून त्यांना आदरांजली व्हावी, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.