म्हासुर्ली/वार्ताहर
गवशी (ता. राधानगरी) येथे सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्याने चार विद्युत भारीत वीजेचे खांब कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा सडलेले विजेचे खांब बदलण्यासाठी वीजवितरण कंपनीकडे लेखी मागणी करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज घटना घडल्याचा ग्रामस्थांतून आरोप केला जात असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सायंकाळी पाच वाजता शाळा सुटलेली असताना मुले घरी जात होती. तर डेअरीला दुध घालण्यासाठी महिलांची धावपळ सुरु होती. अशातच मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुख्य गल्लीतील चार विद्युत खांब मोडून जमिनदोस्त झाले. तसेच विद्युत प्रवाह सुरु असल्याने तारांचा एकमेकांशी संपर्क होताच मोठा आवाज झाला.
यावेळी लहान मुलांसह सुमारे अनेक ग्रामस्थ रस्त्यावर होते. मात्र सर्वांनी प्रसंगावधान दाखवत तारांपासून लांब थांबले. तर गावातील तरुणांनी धावत जाऊन ट्रान्सफार्मर मधुन वीज पुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला.
हे ही वाचा : Sangli : आटपाडीतल्या खिलार खोंडाला मिळाली चारचाकीची किंमत
गवशी येथील सर्व लोखंडी विद्युत खांब गंजलेले होते. ते कोसळून नागरिकांना इजा होऊ नये म्हणून ते बदलावेत अशी मागणी नागरीकांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने कळे-सावर्डे (ता. पन्हाळा) येथील वीज वितरण कार्यालयात केली होती. मात्र विद्युत वितरण कंपनीने इकडे दुर्लक्ष केल्यानेच संबंधित विद्युत खांब कोसळण्याची घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
घटना घडल्यानंतर कोल्हापूर बाजार उत्पन्न समितीचे मा. अध्यक्ष सर्जेराव पाटील व ग्रामस्थ यांनी राधानगरी येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तहसिलदार कार्यालयतील आपत्ती व्यवस्थापनाकडे फोनव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणे बद्दल ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.