कोल्हापूर : प्रतिनिधी
राज ठाकरे यांची भूमिका केवळ भोंगा, डेसीबल इतकी नाही. त्यांची भूमिका तुष्टीकरण म्हणजे चुकीच्या गोष्टीवर अपील करणे आहे. मुस्लिम समाजातील अनेकांना भोंगा नको आहे. जे मुस्लिम आहेत ते भारतीय आहेत. मात्र राज ठाकरे यांचा भोंगा हा एकच विषय नसून अनेक विषय आहेत. ते विषय हळू हळू बाहेर येतील. असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच महाविकास आघाडीने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कधी नव्हे ते राजकीय आणि सामाजिक जीवन गतिमान होत आहे. सकाळी एक विषय तर दुपारी एक विषय टॉपवर जात आहे. राज ठाकरेच्या मुंबई सभेपासून सुरवात झालेल्या भोंग्याच्या विषयावरून मशिदीवरील भोंगे काढा सुप्रीम कोर्टाचे आदेश इथेपर्यंत विषय आज झाले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार चला असे खासदार इम्तियाज झलील यांचे वक्तव्य आहे. त्याचे स्वागत करतो. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
परवानगी घेऊन भोंगे लावा ही राज्य सरकारची भूमिका मला समजली नाही. राम मंदिर वेळी सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुजाण नागरिकप्रमाणे मान्य केले, आणि त्या पद्धतीने काम सुरू आहे. एक सुजाण नागरिक म्हणून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगले मांडतात, तर राज्य सरकारला काय झाले? राज ठाकरे यांच्या इशारा नंतर मुस्लिम समाजाने समजदार पणा दाखवला. मग मुस्लिम समाजाने दाखवलेला समजूतदारपणा दाखवला तो राज्य सरकारने दाखवावा. मात्र त्यांच्या भूमिकेवरून राज्य सरकार धर्मा-धर्मात तेढ निर्माण करत आहे.असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.
महाविकासने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला
आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक कार्यक्रम एका आठवड्यात जाहीर करावा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्यावरून बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. प्रशासन नेमून राज्यात महापालिका चालवण्याचा डाव महाविकास आघाडीचा आहे. भाजप या निवडणुकीत सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करणार आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेले. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.