इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांची माहिती; फेडरेशनच्या बैठकीत झाला निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
26 जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय इरिगेशन फेडरेशनचे संचालक मंडळ व राजर्षी शाहू महाराज लोकोउत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला.कोल्हापूर जिह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकसहभागातून साजरी करण्याचा बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिली.
पाटील म्हणाले, 17 जून रोजी याबाबतचे डिजिटल फलक जिह्यातील प्रमुख बाजारपेठांच्या गावांसह तहसीलदार कार्यालयाच्या दारात लावण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दारात त्याच दिवशी डिजिटल बोर्ड लावला जाणार आहे. शाहू जयंती निमित्त प्रत्येक गावातील शाळेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी 17 तारखेपासून व्याख्यान आयोजित करण्याचे बैठकीत ठरले. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जिह्यामध्ये पुरोगामी विचाराचा वारसा सामान्य जनतेमध्ये रुजवला, ज्यांनी शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून राधानगरी धरण बांधले, बहुजनांच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून सर्व जातीधर्माची वसतिगृहे निर्माण केली, शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून कोल्हापूरमध्ये बाहेरील राज्यातील व्यापाऱयांना आणून शेतीमालाच्या खरेदी-विक्रीची व्यापारपेठ निर्माण केली. आज त्यांनी केलेल्या कामातून ते जिवंत असल्याचे प्रत्येक वेळी आपल्या सर्वाना जाणवत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकांनी लोकोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा बैठकीत निर्णय झाला.
जिह्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांनी या दिवशी आपल्या कार्यालयांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या दिवशी एखादा विधायक कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनच्यावतीने करण्यात आले.
बैठकीस कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष सुभाष शहापुरे, करवीर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आर.के. पाटील, एस.ए. कुलकर्णी, सखाराम चव्हाण, सचिन जमदाडे ज्ञानदेव पाटील, इरिगेशन फेडरेशनचे सचिव मारुती पाटील,संग्रामसिंह माने,उमेश माळी यांच्यासह राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकोउत्सव समितीचे कॉ.चंद्रकांत यादव, रमेश मोरे, अशोक पोवार, तौफिक मुल्लानी, बाबासाहेब देवकर, भारत पाटील-भूयेकर, रणजित पवार, दिगंबर फराकटे, अर्जुन माने यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.