चुये / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील 26 पंचायत समिती मतदार संघाचेआरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या देखरेकीखाली करवीरच्या तहसीलदार शितल मुळे- भामरे यांनी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले तसेच महसुल खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थित करवीर पंचायत समितीच्या राजश्री शाहू सभागृहात लहान मुलांना बोलावून चिठ्ठी व्दारे ही सोडत काढणेत आली.
करवीर तालुक्यातून यापूर्वी 22 पंचायत समिती मतदारसंघ होते. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या सुधारित रचनेनुसार 4 पंचायत समिती मतदारसंघाची वाढ झाली. त्यामुळे आता 26 पंचायत समिती मतदार संघ अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे पंचायत समितीसाठी इच्छूक असलेल्या मातब्बराचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले होते. तालुक्यातील नागरिकांना या आरक्षणाची उत्सुकता लागली होती.
गुरुवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसिलदार शितल मुळे- भामरे यांनी सुरुवातीला उपस्थित सर्वांचे स्वागत करून ही आरक्षण सोडत कशी असणार याबाबत सर्वांना माहिती दिली. त्यानंतर आरक्षण सोडत सुरुवात करण्यात आली. यापूर्वीच्या मतदारसंघांमध्ये जे आरक्षण होते त्याचाही विचार यावेळी केला गेला. तसेच इतर प्रवर्गातील आरक्षण उतरत्या क्रमानुसार करण्यात आले.
तालुक्यातील आरक्षण सोडत खालील प्रमाणे
सर्वसाधारण पुरुष
उचगाव पश्चिम, उचगाव पूर्व, कणेरी, सडोली खालसा, शिंगणापूर परीते, कोपार्डे, दिंडनेर्ली
सर्वसाधारण स्त्री
वसगडे, पाचगाव, कळंबे तर्फे ठाणे, वाकरे, हसुर दुमाला, निगवे दुमाला, निगवे खालसा
अनुसुचित जाती
शिरोली दुमाला ( स्त्री ), शिये (पुरुष), गोकुळ शिरगाव (पुरुष), वळीवडे (स्त्री )
नागरिकांचा मागास प्रवर्ग
स्त्री– वडणगे, खुपिरे, वाशी, उजळाईवाडी
पुरुष– कसबा बीड, सांगरूळ, मुडशिंगी
तालुक्यातून पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येक मतदार संघात इच्छूकांची संख्या जास्त होती. त्यामुळे सर्वांची उत्सुकता आणि लक्ष आरक्षण सोडतीकडे होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना लढण्यासाठी निश्चित संधी मिळाली तर काहींच्या वाट्याला निराशा आली. त्यामुळे तालुक्यात इच्छुकांमध्ये कही खुशी .. कही गम असेच वातावरण पहायला मिळाले.
खुल्या प्रवर्गातील लढती रंगणार
तालुक्यातील 15 पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण गटातील पुरुष व स्त्री साठी आरक्षित झाले. त्यामुळे या 15 मतदारसंघातील विविध पक्षाच्या इच्छुकांच्या जोरदार लढती रंगणार हे आजच्या आरक्षण सोडतीवरून अधोरेखित झालेली आहे.