कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाचा आजचा 251 दिवस आहे. मागण्या मान्य होत नसल्याने या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये मोठी झटापट उडाली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून पुढील टप्प्यात मंत्रालयात घुसून आत्मदहन करू, असा इशारा राज्य सरकारला आंदोलनकर्त्यांनी दिलाय.
काय आहेत मागण्या?
जयप्रभा स्टुडिओ चित्रपट चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे.
जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी, आणि चित्रीकरण व्यतिरिक्त त्याचा व्यावसायिक वापर होऊ नये.
हे ही वाचा : उत्तूरमध्ये चोरट्यांचा हवेत गोळीबार
काय आहे प्रकरण?
मराठी चित्रपटांची शान म्हणजे ‘जयप्रभा स्टुडिओ’ होय. कोल्हापूरच्या मनोरंजन पार्श्वभूमीचा साक्षीदार म्हणून या स्टुडिओकडे पाहिलं जातं. परंतु आज या ऐतिहासिक वास्तूचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ह्या स्टुडिओचं जतन संवर्धन करण्याची मागणी करत थेट लता मंगेशकर यांना भिडणाऱ्या कोल्हापूरकरांना मात्र हा स्टुडिओ विकल्याची पुसटशीही कल्पना नव्हती. तब्बल दोन वर्षांपूर्वीच हा स्टुडिओ शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलांनी खरेदी केल्याचं आज उघड होताच एकच खळबळ उडाली आहे. हा व्यवहार रद्द करून सरकारनेच आता हा स्टुडिओ विकत घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.