राजर्षी शाहू विचार जागर यात्रेसाठी मुंबईला रवाना
कोल्हापूर प्रतिनिधी
सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या विकासाची भूमिका घेत दूरदृष्टीतून निर्णय घेतले. त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली. विकासाचे शाहूंचे मॉडेल आजही लागू पडते. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला सद्यःस्थितीत शाहूंच्या विचाराने वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले. शाहू स्मृती शताब्दी निमित्त आयोजित केलेली शाहू विचार जागर यात्रा बहुजनांसाठी दिशादर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समिती आणि राजर्षी शाहू सलोखा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर ते मुंबई शाहू विचार जागर यात्रा काढण्यात आली आहे. शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकात मंगळवारी सकाळी या शाहू विचार यात्रेला श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रारंभ झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, यशराजराजे छत्रपती, यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू महाराज यांच्या डिजीटल पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, कॉ. दिलीप पवार, कॉ. चंद्रकांत यादव, हर्षल सुर्वे, अजित राऊत, इंद्रजित बोंद्रे, परीक्षित पन्हाळकर, गणी आजरेकर, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, शिवाजी मोरे, प्रताप नाईक, प्राचार्य आर. डी. पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.
शाहूंच्या विचाराचा जागर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यात्रा
शाहू महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाहूंच्या जन्मभूमीतून हा विचार यात्रारथ मुंबईला जाणार आहे. कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे मुंबई असा चित्ररथाचा मार्ग आहे. उभा मारूती, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दसरा चैक, बावडय़ातील शाहू जन्मस्थळ ठिकठिकाणी चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. गुरूवार 5 मे रोजी सकाळी 12 वाजता मुंबईतील चेंबूर येथे हा शाहू विचार जागर यात्रा पोहचणार आहे. दुपारी 4 वाजता खेतवाडी गल्ली नंबर 13, कामाबाग चौक, गिरगाव येथील स्मृती स्तंभाजवळ शाहूंना अभिवादन करून या विचार यात्रा रथाची सांगता होईल. येथे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्तंभाचा लोकार्पण सोहळा होईल. अध्यक्षस्थान माजी आमदार मालोजीराजे छत्रपती भूषवणार आहेत. तर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शाहूप्रेमी कर्तव्य भावनेने या विचार यात्रेत सहभागी झाले आहेत.
शाहूंच्या विचाराचे लक्षवेधी फलक‘जितक्या जोराने प्रतिकार होईल, तितक्या अधिक अडचणी मार्गात येतील, तितक्या अधिक जोराने व ईर्षेने आपल्या कार्यास लागा’,
‘मागासलेल्या जातीला वर आणण्याचे प्रयत्न झाले नाही तर जातीभेदाचे कट्टे अभिमानी वीर तिला (जातीला) दडपून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी मागासलेल्यांचा कैवार घेणे, हे जातीव्देष वाढविणे नव्हे, हे उघड आहे.’,
‘या देशाची उन्न्ती लवकर वा उशिरा होणे, हे येथील जातिभेद ज्या प्रमाणात नाहीसा होईल, त्यावर अवलंबून आहे’, ‘आपले शिक्षण आपल्या हाती घ्या व उन्न्तीच्या मार्गास झपाटय़ाने लागा’.
शाहीरी पोवाड्य़ातून लोकराजाच्या कार्याचा गौरव
शाहीर दिलीप सावंत, शाहीर संजय गुरव यांनी आपल्या पहाडी आवाजात पोवाडा गात शाहूंना अभिवादन केले. ‘छत्रपती शाहू महाराज यांना मुजरा, जीवन कार्यावर पोवाडा, शेतकरी गीत, कवाली, ओवी, लढायला शिक’ असे पोवाडे गाऊन शाहूंच्या कार्याचा उलघडा केला. सहकारी भगवान भोसले, मारूती रणदिवे यांनी साथ केली. सुदर्शन ढाले यांनी हार्मोनियम साथ, योगीराज गुरव यांनी ढोलकी साथ केली.