मतांची बेगमी करताना शिवसेनेची दमछाक; सहकारी पक्ष दुरावत असल्याचे चित्र
मुंबई / प्रतिनिधी
अपक्षांबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षदेखील आव्हान देऊ लागल्याने शिवसेनेसाठी राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक मोठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. यापूर्वी अपक्षांबरोबरच समाजवादी पक्ष आणि महाविकास आघाडीने शिवसेनेपुढे प्रश्न चिन्ह उभे केले आहे. आता मंत्री बच्चू कडू यांनीही शेवटच्या 5 मिनिटात मतदान करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांच्या मतांची जुळवाजुळव करताना शिवसेनेची मोठय़ा प्रमाणात दमछाक होताना दिसत आहे.
मविआच्या सहकाऱ्यांमध्ये नाराजी
सरकार बनविताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्य़ा पक्षांच्या या आमदारांकडे अडीच वर्ष दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडीचे सरकार असून अपक्ष आणि इतर छोटय़ा पक्षांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नाही, अशी नाराजी काही पक्षांतून उमटत आहे. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने करावी, अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
शेवटच्या पाच मिनिटात मतदान
धान उत्पादक शेतकरीदेखील चार ते पाच लाख असून, केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्राने खरेदी सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रती एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे. तसे झाले नाही तर आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असा इशारा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
बविआ, सपा आधीच दूर
महाविकास आघाडीतील मुख्य घटकपक्ष आणि सहकारी पक्ष यांच्या बळावर राज्यसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र जसजसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत, तसतसे सहकारी पक्ष दुरावले जाण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पार्टी यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोणताही पक्ष कायमचा शत्रू नसतो, असे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर बहुजन विकास आघाडीसाठी वसई-विरार महानगरपालिका सोडणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी अल्पसंख्याकांचे प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच नवहिंदुत्वाबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.
शिवसेना आमदार हॉटेलमध्ये
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विरोधाची धार वाढत जाण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना आता हॉटेलमध्ये ठेण्यात येणार आहे. राज्यसभा निवडणुकीला समर्थपणे तोंड देऊ पाहणारे महाविकास आघाडीचे घटकपक्ष आता संभ्रमित असून आमदारांनी प्रलोभनाला बळी पडू नये यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा विचार करत आहे.
तुरुंगातील नेत्यांच्या मतदानासाठी प्रयत्न : खासदार सुप्रिया सुळे
आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहे. हे या दोन्ही नेत्यांवर अन्याय करणारे आहे. पण, आमचा न्यायालयावर विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. दोघांनाही मतदानाची संधी मिळावी यासाठी मंत्री छगन भुजबळ स्वतः प्रयत्न करीत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी.
मतदानाची परवानगी द्या : मलिक
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मंत्री नवाब मलिक यांनीही मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधिश राहुल रोकडे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन्ही अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्दश दिले आहेत. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 8 जून रोजी निश्चित केली.