परीक्षा स्थगितीमुळे अगोदरच उशिर झालेल्या परीक्षेस दिरंगाई; कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; पुढील सत्र वेळेत सुरू करण्यास अडचणी
अहिल्या परकाळे कोल्हापूर
राज्यभरातील विद्यापीठासह शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास कोरोनामुळे अगोदरच उशिर झालेला आहे. यात आता विद्यापीठ आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी पुढची सेमिस्टर सुरू करण्यासही वेळ लागणार आहे. सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या वादात राज्यभरातील लाखो तर शिवाजी विद्यापीठातील 62 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱयांच्या मागण्यांसाठी गेल्या कित्येक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना शासनानेच सुरूवातीला लागू करून पुन्हा ती रद्द केली. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱयांकडून सेवानिवृत्तीच्या वेळी लाखो रुपये वसुल केले जात आहेत. त्यामुळे आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवित करून सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत करावी. तसेच शासकीय व महाविद्यालयीन कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू केला. परंतू विद्यापीठ कर्मचारी शासकीय सेवेत असूनही त्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. ही दुजाभावाची वागणूक सरकारने दिल्याने विद्यापीठ कर्मचाऱयांमध्ये नाराजी आहे. या अगोदरही कर्मचाऱयांनी अनेकदा परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तत्कालीन उच्च व शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगितदेखील केले. परंतू ही आश्वासने वर्षानुवर्षापासून पूर्ण झालेली नाहीत. म्हणूनच या आंदोलनाला व्यापक स्वरूप आले असून महाविद्यालय व विद्यापीठचे लाखो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोरोनात विद्यार्थ्यांचे अगोदरच शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऐवढेच नाही तर शैक्षणिक वर्ष आणि परीक्षा घेण्यासही विलंब झाला आहे. त्यामुळे सर्वच विद्यापीठ जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच आता कर्मचारी आणि सरकारच्या वादाचा फटका विद्यार्थ्यांसह विद्यापीठालाही सोसावा लागणार आहे.
कोरोनात ऑनलाईन परीक्षेची सवय लागलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा देण्याची मानसिकता नव्हती. परंतू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचा रोष ओढवत लेखी वर्णनात्मक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. कसेबसे विद्यार्थी वर्णनात्मक परीक्षा देण्यास तयार झाले आहेत. मोठय़ा तयारीने काही पेपरही झाले. परंतू अचानक कर्मचाऱयांनी 2 फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याने परीक्षा स्थागित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तसेच परीक्षेसंदर्भात अभ्यास करण्याची मानसिकता बदलणार आहे. याचबरोबर परीक्षांच्या निकालावरही परिणाम होणार आहे. पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा मे महिन्यात झाल्या नाहीत. तर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे सरकारने लक्ष घालून कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य करीत हा संप मिटवण्याचा प्रयत्न केला नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
सरकारचा खेळ, कर्मचाऱ्यांचा संप आणि विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
राजकारणात आपली पोळी भाजण्यासाठी सरकार नेहमीच मोठ-मोठी आश्वासने शासकीय कर्मचाऱयांना देते. सत्तेत सरकार आल्यानंतर मात्र या आश्वासनांची त्यांना आठवण राहत नाही. त्यामुळे कर्मचारी सरकारला खिंडीत पकडण्यासाठी ऐन परीक्षेत परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकतात. परीक्षेचे काम करणारे कर्मचारीच नसल्याने विद्यापीठ प्रशासन परीक्षा स्थगित करते. रात्रंदिवस परीक्षेचा अभ्यास करून परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची मध्येच परीक्षा स्थगित झाल्याने, विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागतो. याला जबाबदार कोण याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी चर्चा शैक्षणिक क्षेत्रात आहे.
या कारणासाठी कर्मचाऱ्यांनी छेडले आंदोलन
सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पुंजीतून पुढील आयुष्य निवांतपणे घालवण्याचा विचार प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी करीत असतो. परंतू सरकारने लागू केलेल्या सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केल्याने कर्मचाऱयांना सरकारकडून लाखो रुपये मिळाले. परंतू हीच योजना मध्येच रद्द केल्याने कर्मचाऱयांना दिलेले पैसे सेवानिवृत्तीच्यावेळी कर्मचाऱयांकडून वसूल करीत आहे. या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कर्मचाऱयांनी आंदोलन छेडले आहे. यासह सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.
सरकारने त्वरीत तोडगा काढावा
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने त्वरीत तोडगा काढून, परीक्षा सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. कारण परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईलच, पण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व नोकरीची संधी मिळणार नाही. त्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.
डॉ. व्ही. एम. पाटील (प्राचार्य, न्यू कॉलेज)