राजेश क्षीरसागर शिंदे गटासोबत; एकवटलेली शिवसेना पुन्हा विभागली; जिल्हाप्रमुख संजय पवारांची वाढली जबाबदारी
धीरज बरगे कोल्हापूर
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱया कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची वाट सद्यस्थितीत खडतर बनली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे गटासोबत गेल्याने शहरात प्रभावशील नेतृत्त्वाची पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे अशा गटांमध्ये विभागली होती. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही गटबाजी संपली. शिवसैनिक एकत्र आले, आगामी महापालिका निवडणुकीत याचा फायदा शिवसेनेला होईल, असे चित्र होते. मात्र शिवसेनेतील बंडाळीनंतर एकवटलेली शिवसेना पुन्हा गटामध्ये विभागली आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख संजय पवार यांची जबाबदारी वाढली असून बालेकिल्ल्यात शिवसैनिकांची नव्याने मोट बांधण्याचे आव्हान पवार यांच्यासमोर आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये जिल्हय़ातून सर्वप्रथम आमदार प्रकाश आबिटकर, त्यांच्यापाठोपाठ राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील दाखल झाले. क्षीरसागर, आबिटकर, यड्रावकर यांच्या बंडामुळे जिल्हय़ातही शिवसेनेला हादरे बसले आहेत. विशेषतः महापालिकेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनेचे स्वप्न क्षीरसागर यांच्या बंडामुळे आणखी कठीण बनले आहे. महापालिका निवडणुकीनंतर नव्या सभागृहात शिवसेनेचे संख्याबळ वाढेल, असे चित्र होते. मात्र बंडाळीनंतर ही निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक बनली आहे.
पक्ष बांधणीसाठी तातडीने हालचाली
बंडानंतर शिवसेनेचा विशेष प्रभाव असणाऱया कोल्हापूर शहरामध्ये पक्षबांधणी बळकटीसाठी तातडीने हालचाली सुरु झाल्या आहेत. जयवंत हारुगले, शिवाजीराव जाधव यांचे शहरप्रमुखपद काढून घेतले. तेथे शहरप्रमुखपदी सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांची नियुक्ती केली. सुनील मोदींच्या पाठीशी कोल्हापूरच्या राजकारणाचा 20 ते 25 वर्षांचा अनुभव आहे. रविकिरण इंगवले आक्रमक राजकारणी आहेत. समन्वयक हर्षल सुर्वेंकडे युवावर्ग आकर्षित आहे. त्यामुळे मोदी, इंगवले आणि सुर्वे यांच्यावर पक्षनेतृत्त्वाने टाकलेला विश्वास कितपत सार्थ ठरणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
विधानसभा तिकीटाची अपेक्षा
शिंदे गटासोबत माजी आमदार क्षीरसागर गेल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱया उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सद्यस्थितीन शिवसेनेसमोर ‘उत्तर’मधून सक्षम पर्याय नसला तरी जिल्हा प्रमुख संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे यांना पक्षाकडून विधानसभा तिकीटाची अपेक्षा आहे.
इंगवलेंसमोर ‘दक्षिण’चे आव्हान
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र आहे. या मतदारसंघामध्ये पक्षापेक्षा आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटाचे प्राबल्य असल्याने येथे शिवसेना कमकुवत आहे. अशा या मतदारसंघाचे नेतृत्त्व रविकिरण इंगवलेंकडे दिले आहे. त्यामुळे इंगवलेंसमोर दक्षिणमध्ये शिवसेना मजबूत करण्याचे आव्हान असणार आहे.
शहरात वरचष्मा कोणाचा?
क्षीरसागर यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरात कोटय़वधींची विकासकामे केली. गतवर्षीच्या महापुरातही शिंदे यांनी शहरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यामुळे क्षीरसागर हे शहरात शिंदे गट बळकटीसाठी पुढील काळात प्रयत्न करतील. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना बळही मिळेल. शहरात शिवसेनेचा दबदबा कायम राखण्यासाठी जिल्हाप्रमुख पवार यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. क्षीरसागर आणि पवार या दोघांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. अशा कठीण स्थितीत शहरात शिवसेनेचा वरचष्मा राहणार की शिंदे गटाचा हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.