मालोजी पाटील/ गोकुळ शिरगाव
गाव स्थापन झाल्यापासून हे गाव पूर्णपणे शंभर टक्के शुद्ध शाकाहारी आहे. कोल्हापूर शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेले कोगील खुर्द ता. करवीर हे गाव गावाच्या स्थापनेपासून पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे . या गावांमध्ये कोणत्याही घरात मांसाहार बनवले जात नाही. गावामध्ये कधी मांसाहार पदार्थ सुद्धा आणले जात नाहीत. या गावची परंपरा गाव स्थापन झाले पासूनची आसुन कोगील हे आमचे गाव पूर्ण शाकाहारी असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
सध्या कोल्हापूर म्हणले की संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा खाण्यासाठी लोक या ठिकाणी येतात व तांबड्या पांढऱ्याची चवच न्यारी म्हणून कोल्हापूरची ओळख सांगत जातात. पण याच कोल्हापूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटरवर उंच टेकडीवर कणेरी मठाच्या मंदिराला लागून असलेले हे कोगील गाव संपूर्ण वारकरी संप्रदायाचे असून या ठिकानच्या असलेल्या पाण्याच्या झर्याजवळील महादेवाचे मंदिर व मरगाबाईच्या श्रद्धेपोटी या गावांमध्ये कोणीही गेल्या कित्येक वर्षापासून नव्हे तर गाव स्थापन झाल्यापासून या गावांमध्ये कोणीही मांसाहार अथवा घरात मांसाहार पदार्थ शिजवले जात नाहीत. इथून पुढे सुद्धा कधीही या गावामध्ये कोणीही मांसाहार खाणार नाही व हे गाव गावची परंपरा नष्ट होणार नाही असे इथले ग्रामस्थ ठामपणे विश्वासाने सांगतात.
पूर्वीचे लोक जसे शुद्ध शाकाहारी राहिले त्यांचेच आकलन सध्याची तरुण पिढी सुद्धा या ठिकाणी त्यांचेच गुण अवगत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय आपल्या मित्रांना व नातेवाईकांना सुद्धा या गावातील तरुण मांसाहार करू नका अशी विनंती सुद्धा करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण जिल्ह्यात श्रावण मास चालू झाला आहे या श्रावणामध्ये सगळेच मांसाहार टाळतात पण कोगील हे गाव पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे. गावामध्ये यात्रा, जत्रा मोठ्या प्रमाणात भरते पण या यात्रा सुद्धा पूर्णता शाकाहारी असतात म्हणूनच या गावचे कौतुक आजूबाजूची गावे सुद्धा करतात. गावची ओळख अशीच कायम राहावी यासाठी या गावातील तरुणही पूर्वीच्या पिढीने जसे हे गाव शुद्ध शाकाहारी ठेवले आहे तसेच आपण सुद्धा या गावाची ओळख अशीच ठेवू असा संकल्प सुद्धा इथले तरुण वर्ग करताना पाहायला मिळत आहेत.
गावातील तरुणाची प्रतिक्रिया
कोगील खुर्द येथील तरुण उद्योजक पांडुरंग शिंगटे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की, मी ज्या वेळी या गावांमध्ये जन्माला आलो त्या वेळापासून माझ्या घरच्यांनी मला मांसाहार जेवण असते हे कधी भासूच दिले नाही. शिवाय गाव छोटेसे व प्रत्येक घरात एक वारकरी तर दररोज संध्याकाळी विठ्ठल मंदिरात चालणारे भक्ती संगीत आणि संपूर्ण गावात भक्तीरसात बुडलेले नागरिक पाहून कधीही मांसाहारी आठवण झालीच नाही. शिवाय शुद्ध आहार शाकाहार ही म्हण सुद्धा लहानपणापासून ऐकत आलो. त्यामुळे शरीराला सुद्धा शाकाहार चांगला असतो असे म्हटले जाते म्हणूनच मला माझ्या गावाचा अभिमान आहेच तर इथून पुढच्या पिढ्यांना सुद्धा आम्हाला जसे मागच्या पिढीने घडवले तसेच आम्ही येणाऱ्या नवीन पिढीवर सुद्धा हेच संस्कार करत आहोत व हे गाव पूर्णता शंभर टक्के शाकाहारी पुढेही राहील अशी खात्री आम्हाला या नवीन पिढीकडे पाहून वाटते.