ऑनलाईन टीम/तरुण भारत
शेतकऱ्यांना उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी देतील, अशी स्पष्टोक्ती आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा बँकेच्या सभेत केली होती. यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून यंदा उसाची एफआरपी एकरकमी तर घेऊच उसाला दर किती घ्यायचे ते आम्ही १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत ठरवू. एफआरपी द्यायचीच होती तर महाविकास आघाडी सरकारने एफआरपीची मोडतोड करण्याचा बेकायदेशीर कायदा केला, त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे गप्प का बसले, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने यंदा एकरकमी एफआरपी देतील, असे सुतोवाच केले. तर बँकेचे संचालक आमदार यड्रावकर यांनी उसाच्या गाडीचे टायर न फोडण्याचा अनाहूत सल्ला देखील दिला. त्यावरूनही शेट्टी यांनी हल्लाबोल केलाय.
हे ही वाचा : जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणार
शेतकरी काय गंमत म्हणून टायरी फोडत नाही. ज्यावेळी साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होते व त्याला रस्त्यावर यायला भाग पाडतात, त्यावेळी त्याच्याकडून घडलेली ही प्रतिक्रिया असते.विधिमंडळामध्ये एफआरपीचे तुकडे करण्याचा बेकायदेशीरपणे कायदा मंजूर केला, त्यावेळी हे दोघे मंत्री तोंड मिटून गप्प का बसले, या प्रश्नाचे उत्तर शेतकरी मागत आहेत. एका बाजूला एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संघटीत शक्तीपुढं लोटांगण घालून एफआरपी देण्याची तयारी दाखवायची, तुम्ही असले धंदे बंद करा. गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी सोडून अधिक दोनशे रूपये द्यावे लागतील. इथेनॉल मधून चांगला पैसा मिळालेला आहे. साखरेला दर चांगला मिळाला आहे. एफआरपी पेक्षा जास्त किती देताय ते सांगा मग आम्ही ऊस परिषदेत ठरवू, उसाला किती दर घ्यायचा, असे खडेबोल राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना सुनावले आहेत.