जैवइंधन शेतकरी संघटनेचे शामराव देसाई यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातून केली जाणारी साखर निर्यात तोटय़ात असल्याने साखर निर्यातीस परवानगी देऊ नये. ऊसा पासून साखर निर्मिती नकरता थेट इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला प्रतिटन चार ते साडेपाच हजार रुपये दर देणे शक्य असल्याचा दावा जैव इंधन शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबतची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देसाई म्हणाले, राज्यातील 280 लाख टन अतिरिक्त साखर तोटय़ामध्ये निर्यात केली जाते. साखर निर्यातीचा प्रतिटन दर 22 हजार आहे. तर निर्यात खर्च 10 हजार प्रतिटन आहे. त्यानुसार निर्यातीमधून प्रतिटन 12 हजार रुपये मिळतात. 280 लाखटन साखरेचे निर्यातीने 33 हजार 600 कोटी रुपये मिळतात. 280 लाख टन साखर म्हणजे सरासरी 10 टक्के रिकव्हरीप्रमाणे 28 कोटी टन ऊस होतो. त्याची प्रतिटन एफआरपी 2950 प्रमाणे धरल्यास 82 हजार 600 कोटी होते. म्हणजेच चार वर्षाची साखर निर्यात केल्यामुळे महाराष्ट्रातील ऊसाला एफआरपीपेक्षा 49 हजार कोटी रुपये कमी मिळाले. म्हणजे शेतकऱयाला प्रतिटन 1750 रुपये देय एफआरपीपेक्षा कमी मिळाले असल्याचे देसाई यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे एक टन साखरेचे सहाशे लिटर इथेनॉल होते. अतिरिक्त निर्यात केलेल्या 280 लाख टन साखरेचे 168 लाख टन इथेनॉल निर्मिती होणार आहे. केंद्र शासनाच्या घोषित प्रतिलिटर 63.40 रुपये दराने इथेनॉलचे 1 लाख सहा हजार पाचशे बारा कोटी रुपये होतात. 28 कोटी टन ऊसाची एफआरपी 82 हजार 600 कोटी आदा करुन 23 हजार 912 कोटी जादा मिळतात. त्यामुळे ऊसापासून थेट इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला प्रतिटन चार ते साडेपाच हजार रुपये दर देणे शक्य असल्याचे देसाई यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संघटनेच्या महिला आघाडी राज्याध्यक्षा सुजाता देसाई, बाबुराव पाटील, रुक्मीणी पाटील, सई पाटील आदी उपस्थित होते.