करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला निवेदन
गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजळाईवाडी गावामध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांनी सलग तीन दिवस घरफोड्या करून लाखो रुपयाचे सोन्या ,चांदीचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात चोरांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. तसेच गाव उपनगरात चोऱ्या, घरफोड्या या घटना घडत आहेत. त्यामुळे गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, नेर्ली, तामगाव, कणेरी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतर गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी दिवसा व रात्री गस्त घालून नागरिकांना सुरक्षा देण्याचे काम पोलिसांनी करावे असे निवेदन गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार युवराज कांबळे यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान कदम, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दयानंद शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उद्योजकांच्या तक्रारी सुद्धा खूप आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीत पोलीस स्टेशन असताना सुद्धा एवढ्या मोठ्या चोऱ्या होत आहेत, त्यामुळे उद्योजकही चिंतेत आहेत.