खरीप पेरणीसाठी बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हय़ात सर्वत्र शनिवारी सकाळी तुरळक पाऊस झाला. शहरात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारस सुमारे पंधरा मिनिटे पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर दिवसभर पावसाने उसंत घेतली. पावसाच्या हजेरीने समाधान मिळाले असले तरी जिल्हय़ातील बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मान्सुन पुढील दोन दिवसात जिल्हा व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
जून महिन्याची दहा तारीख आली तरी कडक उन्हाचे चटके कायम होते. त्यामुळे नागरिकांचे मान्सुनच्या आगमनाकडे लक्ष लागून राहिले आहे. मान्सून जुनच्या प्रारंभी येईल असा अंदाज हवामान विभागाचा होता. मात्र प्रत्यक्षात मान्सून लांबणीवर पडला. त्यामुळे बळीराजासह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ात ढग दाटून येवू लागल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली. ढग भरुन आले असले तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली आहे. शनिवारी सकाळपासूनच आभाळ भरुन आले होते. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुमारे पंधरा ते वीस मिनट पावसाने दमदान हजेरी लावली. मात्र यानंतर दिवसभर पावसाने उसंत घेतली.
जिल्हय़ात मेच्या मध्यंतरी झालेल्या दमदार पावसाने शेतकरी बांधवांनी खरीप पेरणीची तयारी वेगाने केली. पेरणी पुर्व मशागतीची कामे मे अखेरीस पूर्ण केली. यानंतर मात्र पेरणीसाठी अद्यापही बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. शनिवार जिल्हय़ात झालेला पाऊस हा पेरणीसाठी पुरक नसल्याने अद्यापही पेरणीची कामे खोळंबली आहेत. पुढील दोन दिवसात मान्सुन जिल्हा व्यापेल असा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.