कोल्हापूर प्रतिनिधी
तृतीयपंथींयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी येथे केले. तसेच या योजनांसाठी तृतीयपंथीयांना प्रत्येक विभाग निश्चित सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन येथे ‘तृतीयपंथी सर्वसमावेशक एक दिवसीय कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, तृतीयपंथीयांची वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक माहिती घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कौशल्य शिक्षण देण्यात आले असून यापुढेही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, जेणेकरुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल. जिह्यातील दोन तृतीयपंथीयांना कंत्राटी तत्वावर नोकरी देण्यात येत आहे. तृतीयपंथी व्यक्तींची स्वतंत्र ओळख कायद्याने मान्य झाली असून निवडणूक व अन्य प्रक्रियेमध्ये त्यांना स्वतंत्र स्थान देण्यात येत आहे. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले, तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्वसमावेशक सर्वेक्षण अर्ज तयार करण्यात आला असून त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. तृतीयपंथीयाच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय सदस्य गौरी सावंत म्हणाल्या, आर्थिकदृष्टय़ा तृतीयपंथीयांनी सक्षम होण्यासाठी अधिकाधिक योजनांची निर्मिती व्हायला हवी. तृतीयपंथीयांना समाजासोबत समाजातच रहायचं आहे, पण समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांना ओळखपत्र देण्याबरोबरच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा.
तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्य व जिल्हा सदस्य ऍड. दिलशाद मुजावर म्हणाल्या, समाजाच्या प्रगतीसाठी तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तृतीयपंथीय समाजाच्या बदलाची सुरुवात कोल्हापूर जिह्यात होत आहे, ही चांगली बाब आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे म्हणाले, तृतीयपंथीयांनी रोजगाराचे परंपरागत साधन बदलून कौशल्य प्रशिक्षण घेवून व्यवसाय करावेत. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम कुमार पाटील, मयुरीताई आळवेकर, जिल्हा प्रतिनिधी अमृता सुतार आदी उपस्थित होते.
‘तरुण भारत’ मधील वृत्त खरे ठरले
कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यात येणाऱ्या तृतीयपंथी गौरी पोवार यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या संदर्भात तरुण भारतने ‘तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी…’ या आशयाचे वृत्त 7 जूनला दिले होते. गुरुवारी तृतीयपंथीयांच्या शिबिरात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते नोकरीचे नियुक्ती पत्र संबंधितांना दिल्याने हे वृत्त खरे ठरले आहे.