प्रयाग चिखली/वार्ताहर
क्षणाक्षणाला पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली गाव जगबुडी पुलाजवळ पुराचे पाणी रस्त्यावर वाढल्याने या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे सकाळी 12 वाजलेपासून केर्ली ठिकाणी बॅरिकेट्स लावून कोल्हापूर कडून येणारी वाहतूक ज्योतिबा रोड मार्गे वळविण्यात आलेली आहे.
दरम्यान, केर्ली गाव ते कोल्हापूर या रस्त्यावर अद्याप वाहतूक चालू आहे. प्रयाग चिखली गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर अद्याप पाणी आलेले नाही. मात्र चिखली ते वरणगे पाडळी दरम्यान क्षेत्र प्रयाग ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर दिवसभर चालू होते. पाणी सतत वाढत असल्यामुळे ग्रामस्थांनी दुभत्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.
कोल्हापूर परिसरात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्यामुळे पुराच्या पाण्यात अद्याप हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झाली नसली तरी परिसरात पुराची धास्ती कायम आहे.