पालकमंत्री दीपक केसरकर : मुंबईतील कोळीवाड्य़ांचा प्राधान्याने विकास करणार : कोल्हापूर, मुंबई पालकमंत्री पदी नियुक्तीनंतर दिली प्रतिक्रीया
प्रतिनिधी/कोल्हापूर
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीरनगरीला जाज्वल असा इतिहास आहे. गटकोटांसह अनेक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे कोल्हापूर जिल्हय़ात आहेत. त्यामुळे जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्याही पर्यटन विकासाला पुढील काळात चालना देणार असल्याचे कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईमधील कोळीवाड्य़ांचाही प्राधान्याने विकास करणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर शनिवारी कोल्हापूर दौऱयावर होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय कार्यालयात ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री केसरकर यांची मुंबई शहर आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याची घोषणा झाली. याप्रसंगी त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जाज्वल असा इतिहास आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये बरेच काही करण्यासारखे आहे. पर्यटन विकासाबाबत श्रीमंत शाहू छत्रपती, संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चाही झाली आहे.
हे ही वाचा : हद्दवाढ समर्थक व विरोधक एकत्र येणार
मुंबईमधील कोळीवाडय़ांचा विकास करणार
सिंधूदूर्ग आणि मुंबईच आगळवेगळ नात आहे. सिंधूदूर्ग व रत्नागिरी येथील लोक मुंबईमध्ये अधिक प्रमाणात आहेत. मुंबईच्या प्रगतीमध्ये कोकणातील लोकांचा मोठा वाटा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही कोकणी लोकांवर भरभरुन प्रेम केले. बाळासाहेबांनी मुंबई महापालिकेतही कोकणी लोकांना संधी दिली. आता मुंबईचे पालकमंत्री पद मिळाल्याने येथील कोळी लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. याकाळात मुंबईमधील कोळीवाडय़ांचा प्राधान्याने विकास करणार आहे. कोळी लोकांसाठी स्वतंत्र विभाग आहे. याची जबाबदारी सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे आहे. ते माझे चांगले मित्र आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुंबईमधील कोळीवाडय़ांच्या विकासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरचे पालकमंत्री कोण?
कोल्हापूर दौऱयावर असताना मंत्री केसरकर यांची मुबई शहर आणि कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी सध्या जाहीर झालेल्या पालकमंत्री पदाच्या यादीमधील पालकमंत्र्यांना देण्यात आलेले जिल्हे कमी होणार आहेत. पुढील काळात कोल्हापूर जिल्हा दूसऱयाकडे जाईल असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे सध्यातरी दीपक केसरकर कोल्हापुरचे पालकमंत्री असले तरी पुढील काळात कोल्हापुरचे पालकमंत्री कोण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.