कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशातील गुणवत्ता यादीत 749 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून 712 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली गावचा सुपुत्र स्वप्नील तुकाराम माने यांनी 578 वी रँक तर प्री-आयएस ट्रेनिंग सेंटरचा ओमकार राजेंद्र शिंदे (ज्योतिर्लिंग कॉलनी गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) यांनी 433 वी रँक, शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील आशिष अशोक पाटील यांती 563 वी रँक मिळवत कोल्हापूरचा झेंडा देशात उंचावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव नातेवाईक व समाजातील सर्व स्थरातून होत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 17 मार्च 2021 रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे या कालावधीत घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर सोमवारी अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याबद्दल सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱया विद्यार्थ्यांशी ‘तरूण भारत’ने संवाद साधून त्यांच्या भावना, अभ्यासाची पद्धत यांची माहिती घेतली असता त्यांनी दिलेली माहिती नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
आयुष्यात जिद्द असली पाहिजे : स्वप्नील माने
युपीएससीच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मिळते. शंभर रूपये शुल्कात परीक्षा अर्ज भरून क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघत जिद्द बाळगली पाहिजे. कोणत्याही प्रसंगाला न घाबरता युपीएससीच्या परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. माझ्या आईचे स्वप्न आणि वडील, आजी-आजोबा, बहिणींनीचे कष्ट, त्यांनी माझ्यासाठी केलेल्या त्यागाचा हा विजय आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण सिध्दनेर्ली विद्यालय जुनिअर कॉलेज येथे तर बीटेकचे शिक्षण पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले. बीटेकला गोल्ड मेडल असताना युपीएससी करण्याची जिद्द होती. त्यानुसार प्रयत्न केल्याने यश मिळाले.
स्वतःवर विश्वास ठेवा : आशिष पाटील
माझे दहावीपर्यंतचे शिक्षण साळशी व भांबवडे येथील मराठी शाळेत झाले. पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमध्ये अकरावी, बारावीपर्यंतचे तर पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बीटेकपर्यंतचे शिक्षण झाले. युपीएससीच्या परीक्षेत दुसऱया प्रयत्नात यश मिळाले. विद्यार्थ्यांनी आपण ग्रामीण भागातून आलो, इंग्रजी भाषा येईल की नाही, असा न्यूनगंड बाळगू नये. ऑफशनल विषयासाठी खासगी शिकवणी लावली असली तरी सेल्फ स्टडीवर भर दिला होता. आठवीत असल्यापासूनच आई-वडील व शिक्षकांनी युपीएससीचे स्वप्न दाखवले होते. ते आज मी पूर्ण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास केला पाहिजे. साळशी खोऱयात आशिष युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले पहिलेच सुपुत्र आहेत. त्यामतुळे गावात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
कुटुंबियांच्या कष्टाला यश
स्वप्नील यांचे लहानपणीच आईचे तर चार वर्षापुर्वी वडीलांचे छत्र हरवले. आजी-आजोबा आणि दोन बहिणी यांनी मोठ्य़ा कष्टाने त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन व सहकार्य केले. आपल्या स्वप्नीलचे यश पाहून आजी-आजोबा आणि बहिणींनी फटाके उडवत आनंद व्यक्त केला आहे. परंतू स्वप्नील गावी आल्यानंतर कुटुंबिय व ग्रामस्थांकडून जंगी स्वागत केले जाणार आहे. या गावातील युपीएससी परीक्षेत यश मिळवलेला स्वप्नील पहिलाच सुपुत्र आहे. त्यामुळे गावातील लोकही आनंदी आहेत.