प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून केला पंचनामा
उचगाव/ वार्ताहर
एका बाजूला पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल प्रशासन ढोल बडवत असतानाच शुक्रवार, शनिवारी वळीवडे (ता. करवीर) येथील सुर्वे बंधाऱ्यामध्ये पंचगंगा नदीत मृत माशांचा खच पडला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सलग तिसऱ्या वर्षी असा प्रकार घडत आहे.
पंचगंगा नदीचा गांधीनगर घाट परिसर, निगडेवाडी येथील घाट व वळीवडे घाट परिसरात मृत माशे पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत. वळीवडे बंधाऱ्यानजीक तर माशांचा मोठा खच पडला आहे. या परिसरात दुर्गंधी इतकी पसरली आहे की आंघोळीसाठी आलेले लोक नदीमध्ये अंघोळ न करताच परतत आहेत. या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वळिवडे लोकनियुक्त सरपंच रुपाली रणजीत कुसाळे, रणजीत कुसाळे,राजगोंडा वळिवडे, भैय्या इंगवले यांनी प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी घटनास्थळी बोलावून धारेवर धरले. घटनास्थळाचा पंचनामा प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी केला.
‘मासे ही जलसंपत्ती असून तिचा नाश कशामुळे झाला, मासे मृत्युमुखी पडण्यास कोणते कारण घडले, हे प्रशासनाने शोधून काढून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.
*सलग तीन वर्षांपासून जानेवारीच्या दरम्यान हे मृत मासे आढळून येत आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन दरबारी मोठे प्रयत्न होतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासूनच्या या मृत माशांच्या प्रश्नावर नेमके प्रशासनाने काय केले, दिवसागणिक प्रदूषणामध्ये वाढ का होते, याबाबत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.*
दररोजच्या खर्चासाठी नदीचे पाणी वापरले जाते. नदीमध्ये मासे मेल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस हे पाणी वापरता येणार नाही. प्रशासनाने संबंधित घटकांवर कारवाई करावी आणि येथून पुढे असा प्रकार घडू नये याची दखल घ्यावी.
-रुपाली रणजितसिंह कुसाळे, लोकनियुक्त सरपंच, वळीवडे.