कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेचे शिंगणापूरसह तीन उपसा केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी आले आहे. सध्या उपसा केंद्र येथे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 544 इतकी आहे. 546 मीटरवर पाणी आले तरच येथील उपसा बंद ठेवावे लागतात. त्यामुळे सध्या तरी शहरातील पाणी संकट नाही.त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली आहे. तसेच अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.
कोल्हापूरमध्ये चार दिवस जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढली आहे. शहरासह धरणक्षेत्रात आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून स्वयंचलित चार दरवाजे उघडल्याने मोठय़ा प्रमाणात धरणातून विसर्ग सुरू झाला. पंचगंगेचे 41 फुटांवर पाणी पातळी गेल्याने नदी पात्रातून पाणी बाहेर पडू लागले असून महापालिकेच्या शिंगणापूर उपसा केंद्राला चारही बाजूने पाणी आले आहे. हीच स्थिती नागदेववाडी आणि बालिंगा परिसरात आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद होणार असल्याचा संदेश सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, सध्य स्थिती अशी नसल्याचा खुलासा जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी केला आहे.
पाणी संकट नाही
शिंगणापूर उपसा केंद्राच्या चारही बाजूने एक फुटांवर पूराचे पाणी आले आहे. येथील उपसा केंद्राच्या परिसरात पंचगंगा नदीची 544 मीटर इतकी पाणी पातळी आहे. आणखीन दोन मीटर (सहा फुट) म्हणजेच 546 मीटर अथवा राजाराम बंधारा येथील 46 फुट पाणी पातळी गेली तर मात्र, उपसा केंद्र बंद होण्याचा धोका असतो. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने ही स्थिती निर्माण होणार नाही, असा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
तरीही पाणीपुरवाठा राहणार सुरू
पाणीपुरवठा खंडीत होण्याचा सध्या तरी धोका नाही. जर उपसा केंद्र पाण्यात गेले तरीही शहरातील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. बालिंगा उपसा केंद्रात दोन सबमर्सिबल पंप बसल्याने ए, बी, सी आणि डी वॉर्डमध्ये दिवसाआड पाणी देता येणार आहे. ई वॉर्डमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य आहे, मात्र, सध्या अशी स्थिती नाही