शांतता कमिटी बैठकीत मार्गदर्शन; गणेश मंडळांना बालमृत्युवर जागृती करण्याचे आवाहन
प्रतिनिधी | अक्कलकोट
गणरायाचे स्वागत शांततेत करा असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव यांनी केले. मंगळवारी सायंकाळी येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ही शांतता समितीची बैठक उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी सामाजिक उपक्रम गणेशोत्सवानिमित्त राबवावेत व अक्कलकोट तालुक्यात बालकांच्या मृत्युदराचे प्रमाण खूप मोठे आहे त्या संदर्भात जागृती करावी असे आवाहन केले. अक्कलकोट नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी गणेश मूर्तीचे दान करून पर्यावरणाचे रक्षण करावे. नगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी गणेशोत्सवात काळजी घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी पोलीस बंदोबस्ताची गरज भासणार नाही. आम्ही एकजुटीने गणेशोत्सव साजरा करू असे अभिवचन दिले. तर रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांनी उत्सवाच्या माध्यमातून गुंडागर्दी करणाऱ्यांना धडा शिकवा अशी मागणी केली. याची नोंद घेत हिम्मतराव जाधव यांनी गुंडांचा बंदोबस्त निश्चितपणे केला जाईल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, रासपा जिल्हा अध्यक्ष सुनील बंडगर, शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रशेखर मडीखाबे, भाजप शहराध्यक्ष शिवशरण योजन, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष माणिक बिराजदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या बैठकीला नगरसेवक महेश हिंडोळे, सद्दाम शेरीकर, सुनील खवळे, मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेस अध्यक्ष अल्लोळी, प्रहार अध्यक्ष शिरसाट, वसंत देडे, चौगुले, शेळके यांच्यासह उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र कोळी, दक्षिण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे, वळसंग पोलीस स्टेशनचे निरीक्षक अतुल भोसले, विठ्ठल तेली, धनराज शिंदे, गजानन शिंदे यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.