मुख्य सचिवांकडून तीव्र नाराजी : जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करुन कामावर येण्याचे आदेश : अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
प्रतिनिधी/कोल्हापूर
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे काम असमाधानकारक असल्याबद्दल मुख्य सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 7 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे हे काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, यांच्यासह कर्मचार्यांच्या 3 ते 5 सप्टेंबरपर्यंतच्या सुट्ट्य़ा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान ऐन गणेशोत्सवात सुटय़ा रद्द केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
मुंबईत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती अद्यावत करण्याबाबत दुरदृष्य प्रणालीव्दारे बैठक झाली. अध्यक्षस्थानी मुख्य सचिव होते. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार सहभागी झाले होते.
बैठकीत मुख्य सचिवांनी कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती अत्यंत असमाधानकारक अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची माहिती अद्यावत करणे व त्यांची ई के. वाय. सी. पुर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 7 सप्टेंबरपर्यंत दिली.
त्या पार्श्वभूमीवर हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी रेखावार यांनी 3 ते 5 सप्टेंबरपर्यंत असलेल्या शासकिय सुटय़ा रद्द करुन कामावर येण्याचे आदेश सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तलाठी यांच्यासह संबंधित कर्मचार्यांना दिले.
या तीन दिवसांच्या सुट्टय़ांमध्ये उर्वरित कामकाज कॅम्प लावून पुर्ण करण्यासाठी तहसिलदारांनी नियोजन करावे. तसेच प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त तालुक्यांना या तीनही दिवशी दररोज भेट देवून हे काम वेळेत पूर्ण करुन घेणेबाबतचे प्रभावी संनियंत्रण करावे. दिलेल्या वेळेत कामकाज पुर्ण झाले नाही, तसेच लाभार्थी या लाभापासून वंचित राहील्यास याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल, असा इशाराही या आदेशाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी
ऐन गणेशत्सवात आलेल्या शासकिय सुटय़ा रद्द करण्याचे आदेश दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. इतर सुट्ट्य़ांवेळी आम्ही कामावर येऊन कामे केली आहेतच की, आम्हाला सणवार काय आहे की नाही? अशा शब्दात त्यांच्याकडून भावना व्यक्त होत आहेत.