युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक विधान : आदिलशाहाचा दबाव आणि शहाजीराजेंच्या मुसद्दीगिरीचा दाखला देत ठाकरे, पवारांवर निशाणा, स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शिवरायांच्या विचाराचे राज्य उभाण्यास सज्ज होण्याचे शिवभक्तांना आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी आदिलशाहाने शहाजीराजे यांच्यावर दबाव वाढविला होता. पण मुस्सद्दी असणाऱया शहाजीराजेंनी शिवाजी पळून गेला. तो माझ्या हुकूमात नाही, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा, अशा शब्दात आदिलशाहाला उत्तर दिले होते. या राजकीय मुसद्दीगिरीतून शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन्यासाठी रान रिकामे करून दिले होते, या ऐतिहासिक घटनेचा दाखला देत माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे संस्थापक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींवर सूचक वक्तव्य केले.
दुर्गराज किल्ले रायगडवर सोमवारी 348 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवभक्तांच्या अलोट गर्दीत साजरा झाला. शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीने आयोजित केलेल्या या सोहळ्य़ात संभाजीराजे आपल्या आगामी वाटचालीबरोबर यापूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घडामोडींविषयी काय बोलणार याकडे साऱयांच्या नजरा होत्या. शिवभक्तांना मार्गदर्शन करताना संभाजीराजे यांनी गतकाळातील राजकीय घडामोडींवर ऐतिहासिक घटना, प्रसंगांचे दाखले देत भाष्य केले.
राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे यांनी माघार घेतली होती. शिवसेनेच्या अटी, शर्ती त्यांनी अमान्य केल्या होत्या. माघारीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारल्याने छत्रपती घराण्याचा अवमान झालेला नाही, राज्यसभेची उमेदवारी हा संभाजीराजे यांचा वैयक्तिक विषय होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यु टर्न घेतलेला नाही, उलट संभाजीराजेंच्या अपक्ष लढण्यामागे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर संभाजीराजे यांनी शाहू छत्रपती यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देण्यास नकार देताना स्वतःच्या विधानांवर कायम असल्याचे स्पष्ट केले होते.
या सर्व राजकीय घडामोडीनंतर संभाजीराजेंनी सोमवारी शिवराज्याभिषेक दिनी आपल्या भाषणात सूचक विधान केले. मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख न करता ऐतिहासिक दाखला देत संभाजीराजे म्हणाले, छत्रपती घराण्यात भांडणे लावण्याचे उद्योग यापूर्वीही झाले. दबाव आणला गेला. शिवाजी महाराज गड, किल्ले जिंकू लागल्यानंतर आदिलशाह चिंतेत पडला होता त्याने शहाजीराजे यांच्यावर दबाव वाढविला. फर्मान काढले. आपण आपल्या मुलाला घरीच थांबवा, रोखा, ताकीद द्या अन्यथा बादशाहा आपल्या खपा होईल. पण शहाजीराजे चतुर, मुसद्दी होते. त्यांनी राजकीय मुसद्दीगिरी दाखवित आदिलशाहाला पत्र लिहिले. पत्रात म्हटले, मी आपल्याशी प्रामाणिक आहे. मात्र शिवाजी माझा लेक (मुलगा) असला तरी तो पळून गेला आहे. माझ्या हुकमतीत नाही (माझे ऐकत नाही). त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते करा. या पत्रानंतर शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी एकप्रकारे रान मोकळे करून दिले. याला मुसद्दीगिरी म्हणतात. पुढे शिवाजी महाराजांनी पातशाहींना नमवत स्वराज्याचे तोरण बांधले.
शिवरायांनी बंधने झुगारत स्वराज्य उभारले
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक चढ – उतार अनुभवले, एकावेळी अनेक शत्रूंचा सामना केला. प्रसंगी तडजोडी केल्या पण बंधने स्वीकारली नाही. बंधनात न राहतात, स्वराज्य उभे केले. आपल्या देशाला आठशे वर्षात पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाले तो दिन शिवराज्याभिषेक दिन होता. आता पुन्हा शिवरायांच्या विचाराचे स्वराज्य उभारण्यासाठी सज्ज व्हावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केली.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य
संभाजीराजे यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, युगप्रर्वतक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांना वंदन केले. भाषणाचा समारोप त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य अशी घोषणा देत केला. जय स्वराज्य या घोषणेतून त्यांनी आगामी वाटचालीचे संकेत दिले.