आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहरापासून 23 किलोमीटरवर असणाऱया कोंडापल्ली या छोटय़ा गावाने चीनच्याही छातीत धडकी भरवणारा पराक्रम दाखवला आहे. या गावातील कुशल कारागिरांनी लाकडी खेळणी बनविली असून या खेळण्यांनी चीनहून आयात होणाऱया अशाच खेळण्यांना मात दिली आहे. या गावात लाकडी खेळणी बनविण्याची परंपरा 400 वर्षांपासूनची आहे.
केंद्र सरकारने या खेळणी बनविण्याच्या कलेला आता ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ (भौगोलिक मानांकन) दिले आहे. हे मानांकन पारंपरिक कलांच्या आधारे बनविलेल्या वस्तूंसाठी दिले जाते. या गावाची लोकसंख्या 35 हजार असून त्यापैकी 100 परिवार अशी खेळणी निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. सध्या लहान-मोठय़ा चिनी वस्तूंनी भारताची बाजारपेठ व्यापलेली दिसते. दहा-वीस रुपयांच्या इलेक्ट्रिकच्या माळांपासून मोठय़ा यंत्रसामग्रीचा या चिनी वस्तूंमध्ये समावेश असतो. तथापि, आता भारतीय कारागिरांचीही अस्मिता जागृत झाली असून त्यांनी भारतीय परंपरेचा आधार घेत आणि या परंपरेला आधुनिकतेची जोड देत चीनच्या वस्तूंना जबरदस्त स्पर्धा सुरू केली आहे. भारतीय ग्राहकही आवर्जून स्वदेश निर्मित वस्तूंची मागणी व्यापाऱयांकडे करीत आहेत. या बदलत्या मानसिकतेचा लाभही कोंडापल्ली गावातील खेळणी निर्मात्यांना होत आहे. गेल्या तीन वर्षात या खेळण्यांची उलाढाल वीसपट वाढल्याचे दिसत आहे.
ही खेळणी संपूर्णतः हाताने बनविली जातात. यासाठी यंत्रांचा वापर होत नाही. याच परिसरात उगवणाऱया तेल्लापुनिकी या झाडाच्या लाकडापासून ती बनविली जातात. हे लाकूड वजनाला हलके आणि मृदू असल्याने त्यावर कलाकुसर करणे सुलभ आहे. स्थानिक नैसर्गिक साधनांपासून बनलेल्या डिंकाने या खेळण्यांचे भाग जोडले जातात. यामुळे ही खेळणी बालकांपासून अत्यंत सुरक्षित आहेत.