अखेर वीस तासानंतर रेस्क्यु टीमला यश
वाळवा/ प्रतिनिधी
शुक्रवारी सुर्यगाव येथील सागर महादेव सुर्यवंशी (वय ३६) हा तरूण कृष्णा नदीकाठी पोहताना दम लागून बुडाला होता. शुक्रवारी दुपार पासून सागर सुर्यवंशी याची युध्द पातळीवर शोध मोहीम सुरू होती. शनिवारी सकाळी सांगलीच्या आयुष भारत टीमच्या व भारती विद्यापीठ यांच्या बोटीच्या सहाय्याने अखेर वीस तासानंतर रेस्क्यु टीमला सागर याचा मृत्यदेह शोधण्यात यश आले.
शुक्रवारी दि. १५ एप्रिल रोजी सागर सुर्यवंशी हा तरूण सुर्यगावच्या पाणवठ्यावरून बुर्लीच्या बाजूला पैलतीरावर पोहत आला. मात्र पैलतीर वीस तीस फुट अंतरावर राहिला असतानाच दम लागून तो बुडू लागला. ही बाब सुर्यगावच्या पाणवठ्यावरून पाहणाऱ्या तरूणांच्या लक्षात आली, लगेचच त्यांनी पाण्यात उड्या टाकून सागरला वाचवण्यासाठी धाव घेतली.
मात्र बुर्लीच्या पैलतीरावर पोहचेपर्यंत सागर बुडाला होता. तरूणांनी बराच वेळ शोध घेऊनही तो सापडू शकला नाही. त्यानंतर आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह भारती रेस्क्यू टिमने घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सायंकाळी उशीरापर्यंत राबविली. आज सकाळी आयुष भारत व भारती रेक्यू टीमच्या वतीने शोध घेत असताना ज्या ठिकाणी तो बुडाला होता त्याच्या काही अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. सागर याच्या घरी आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी सुर्यगांव पाणवठ्यावर मोठी गर्दी केली होती.
तहसीलदार निवास ढाणे व वन विभागाचे अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देऊन तपास कामाला गती दिली.
दरम्यान शनिवारी दुपारी एक वाजता पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर सागर सूर्यवंशी याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणामध्ये सुर्यगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पाटील व नातेवाईकांनी भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची फिर्याद दिली असून सरपंच विकास सूर्यवंशी, पोलीस पाटील संदीप पाटील व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी तपास कामाला मोठी मदत केली.