गुरुवंदना कार्यक्रमात मंजुनाथ भारती यांचे प्रतिपादन
खानापूर : क्षत्रियांचे क्षात्रतेज हे दुसऱयांना सामावून घेऊन पुढे जाणे आहे. क्षत्रिय मराठा समाजाने विज्ञानाची कास धरून वाटचाल करून प्रगती साधावी, असे आवाहन गुरुवंदना कार्यक्रमात गोसावी मठाचे मठाधीश मंजुनाथ भारती यांनी केले.
खानापुरात मंजुनाथ भारती यांच्या पट्टाभिषेकानंतर गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला बसवेश्वर महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांना मंजुनाथ भारती यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. त्यानंतर पाटील गार्डन येथे गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर उपस्थितांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. खानापूर क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने मंजुनाथ भारती यांचा यथोचित सत्कार करण्यात
आला.
मंजुनाथ भारती पुढे म्हणाले, शिवरायांचे चरित्र, आदर्श विचार मराठा समाजाने आत्मसात करून त्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. समाजाने उन्नतीसाठी वेगवेगळे पर्याय निवडले पाहिजेत. पालकांनी मुलांना चांगले संस्कार देऊन चांगली पिढी निर्माण केली पाहिजे, तरच समाज भविष्यात चांगल्या विचारावर उभा राहील.
कर्नाटक क्षत्रिय परिषदेचे राज्याध्यक्ष सुरेशराव साठे म्हणाले, बेंगळूर येथे मराठा समाजाचे विद्यालय आहे. ज्यांना या विद्यालयातून शिक्षण घ्यायचे आहे त्यांना आम्ही सहकार्य करू, कर्नाटकात मराठा समाजाला एकत्र आणून टू-एचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
श्री भगवान गिरी यांनी, समाजावर प्रत्येकाची निष्ठा असणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सोनाली सरनोबत, सुनील चव्हाण, व्यंकटेश चव्हाण यांची भाषणे झाली. रमेश पाटील यांनी आभार मानले. तालुक्यातील मराठा समाज यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होता.